
Anjunem Dam Banned for Tourists: निसर्गसौंदर्याने नटलेल्या अंजुणे धरणाच्या परिसरात सध्या पर्यटक आणि पिकनिकसाठी येणाऱ्यांची गर्दी होत असून, त्यामुळे धरण परिसरात अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा खात्याने अंजुणे धरणाजवळ पिकनिकसाठी येणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाळपई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती जलसंपदा खात्याचे अधीक्षक अभियंता दिलीप नाईक यांनी दिली.
ही तक्रार बुधवार, २५ रोजी वाळपई पोलिस स्थानकात देण्यात आलेली आहे. धरण परिसरात सध्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. धरणाच्या मागील बाजूस असलेल्या बॅकवॉटर क्षेत्रात अनेक पर्यटक फोटो काढण्यासाठी जात असून, ‘मिनी काश्मीर’ असा उल्लेख करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आहेत.
यामुळे अनेक अनभिज्ञ पर्यटक या ठिकाणी पोहोचत असून, त्यामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासात व्यत्यय निर्माण होत आहे. हा परिसर म्हणजे वाघ, अस्वल, बिबट्या, गवा आणि विविध उभयचर व सरपटणाऱ्या प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास असून, मानवी हालचालींमुळे त्यांना धोका निर्माण होत आहे. तसेच वाहतूक कोंडी, कचऱ्याचे प्रमाण आणि जंगलात मानवी हस्तक्षेप वाढत आहे.
जलसंपदा खात्याचे अधीक्षक अभियंता दिलीप नाईक म्हणाले की, धरण परिसर हा पिकनिकसाठी किंवा पर्यटनासाठी नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वन्यजीव संवर्धनासाठी या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. संबंधित कार्यकारी अभियंत्यांना वाळपई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.