

पणजी: राज्यात १३ ठिकाणी पडून असलेल्या ७.४८ लाख मेट्रिक टन खनिज मालाच्या ई-लिलावातून सरकारला सुमारे १३६ कोटींचा महसूल मिळाला आहे. गत १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी या मालाचा लिलाव करण्यात आला, अशी माहिती खाण संचालक नारायण गाड यांनी ‘गोमन्तक’ला दिली.
२००७ ते २०१२ या कालावधीत विविध कंपन्यांनी जो खनिज माल काढून ठेवला होता, तो ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिले होते. त्यानुसार ही लिलाव प्रक्रिया सुरू आहे.
१३ आणि १४ नोव्हेंबर असे दोन दिवस झालेल्या ३१ व्या लिलाव प्रक्रियेत नावेली, धारबांदोडा, मये, शिरगाव, कोडली, पाळी, कोळंब आदी ठिकाणी असलेल्या ७.४८ लाख मेट्रिक टन मालाचा लिलाव करण्यात आला. त्यात अपरांत मेटल, सेझा रिसोर्स, चौगुले, साळगावकर शिपिंग, व्यंकटेश्वरा पॉवर आदी कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या लिलावातून सरकारच्या तिजोरीत सुमारे १३६ कोटींचा महसूल जमा झाल्याचे गाड यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील खाणी गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. त्याचा फटका राज्याच्या महसुलाला बसत असल्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून खाण लीज, डंप आणि पडून असलेल्या खनिज मालाचा ई-लिलाव करण्याची प्रक्रिया सरकारने गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून २०१२ पासून १३ ठिकाणी पडून असलेल्या ७.४८ लाख मेट्रिक टन खनिजाचा लिलाव खात्याने केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.