

पणजी: गोव्यात सध्या हंगामी रानमेवा आणि आंब्यांची बाजारपेठ गजबजलेली दिसत आहे. आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाला असून विविध जातींचे आंबे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
गोमंतकीयांच्या विशेष पसंतीचा मानकुराद आंबा सध्या २ हजार रुपये प्रतिडझन दराने विकला जात आहे. विशेष म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी कमी आवक असल्यामुळे याच आंब्याचा दर तब्बल ५ हजार रुपये प्रतिडझन इतका होता. आता आवक वाढल्याने दरात काहीशी घट झाली आहे.
आंब्याबरोबरच रानात मिळणाऱ्या पदार्थांनाही मोठी मागणी आहे. तोरणे ५० रुपये प्रतिवाटा, फणसाचे गरे १०० रुपये प्रतिवाटा तसेच, काजू ‘नीरा’ची एक लिटर बाटली १०० ते १५० रुपयांत विकली जात असून सकाळच्या वेळी अनेक नागरिक खास ‘नीरा’ खरेदीसाठी बाजारात गर्दी करताना दिसत आहेत.
पूर्वी आंब्याच्या हंगामात बाजारात गेल्यावर दूरवरूनच आंब्याचा दरवळ जाणवत असे. मात्र, आता मोठ्या प्रमाणात आंबे उपलब्ध असूनही त्यांचा खास सुगंध जाणवत नाही. हातात घेतलेल्या पिकलेल्या आंब्यालाही वास नसल्याची खंत ग्राहक व्यक्त करत आहेत. यामागे आंबे पिकवण्याच्या पारंपरिक पद्धतींमध्ये झालेला बदल कारणीभूत असल्याचे जाणकारांचे मत आहे. पूर्वी गवतात ठेवून नैसर्गिकरीत्या आंबे पिकवले जात, तर आता आधुनिक पद्धती वापरल्या जातात.
भाज्यांचे दर नियंत्रणात
सध्या बाजारात भाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. कांदा २६ रुपये, बटाटा २५ रुपये, टोमॅटो ३५ रुपये, भेंडी ८० रुपये, कोबी २० रुपये, गाजर ६० रुपये, फ्लॉवर ४० रुपये, चिटकी ६५ रुपये, मिरची १२० रुपये किलो दराने विकली जात आहे. मात्र, बिन्सच्या दरात वाढ झाली असून, मागील आठवड्यात ७० रुपये असलेला दर आता १०० रुपये प्रतिकिलो झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.