

पणजी: राज्यात यंदा आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. गेल्या महिन्यात आंब्याच्या दरात लक्षणीय घट झाली होती. मानकुराद आंबा ४०० ते ५०० रुपये प्रतिडझन दराने विकला जात होता, तर इतर आंब्यांचे दर त्याहूनही कमी
झाले होते. मात्र, आता आंबा हंगामाच्या अखेरीस पोहोचला असून आवक घटल्याने दर पुन्हा वाढले आहेत.
सध्या पणजी बाजारात मानकुराद आंबा ८०० रुपये प्रतिडझन दराने विकला जात आहे. मांगेलाल आणि हापूस आंब्यांचे दर प्रत्येकी ५००
रुपये प्रतिडझन आहेत. मागील पंधरवड्यात आंब्याचे उत्पादन कमी झाले असून, पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढल्यास आवक आणखी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर वाढले असले तरी आंब्याचे शौकीन खरेदीसाठी बाजारात गर्दी करताना दिसत आहेत.
आंब्यासोबतच फणसाचे गरे, जांभळे आणि अन्य रानमेवा बाजारात दाखल झाला आहे. भाजीची केळी, गावठी पपई तसेच स्थानिक भाज्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. बेळगावहून येणाऱ्या भाज्यांच्या तुलनेत स्थानिक उत्पादनांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात लिंबाचे दर अद्यापही चढेच असून, लहान आकाराची आठ लिंबे ५० रुपयांना विकली जात आहेत. मक्याची कणसे आणि इतर हंगामी उत्पादनेही बाजारात उपलब्ध असून त्यांनाही चांगली मागणी आहे.
सहा महिन्यांपासून नारळाच्या दरात मोठी वाढ झाली असून ती कायम आहे. सध्या लहान आकाराचा नारळ ३० रुपये प्रतिनग, तर मध्यम आकाराचा नारळ ५० रुपये प्रतिनग दराने विकला जात आहे. पावसाळ्यात लागणारे कोकम सोले, आगळ आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी लागणाऱ्या साहित्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बाजारातील विक्रेत्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.