सासष्टी, आपण कुठल्याही स्थानिक नेत्यांना २०२७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे आश्र्वासन दिले आहे हा समज चुकीचा असून आपण तसे कुणालाही आश्र्वासन दिलेले नाही.
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी केंद्रीय समिती ठरवेल. विधानसभा निवडणुकीला तीन वर्षे बाकी आहेत.
त्याचा विचार आत्ताच का करावा, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मडगावात पत्रकारांकडे बोलताना स्पष्ट केले.
सदानंद शेट तानावडे यांनी आज दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात पन्ना, बूथ, मंडळ प्रमुख यांची बैठक घेतली व लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
आम्ही गेली दोन वर्षे लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आलो असून अनेक कार्यक्रम राबविले. त्यामुळे कार्यकर्ते व मतदार यांच्यामध्ये चांगले नाते निर्माण झाले. त्याचा फायदा पक्षाला निश्र्चितच या निवडणुकीत होईल, असेही तानावडे म्हणाले.
‘भाजप दोन्ही जागा जिंकणार’
जास्तीत जास्त मतदारांना मतदार केंद्रांवर कसे न्यावे याबद्दलची चर्चा मंडळ प्रमुखांच्या बैठकीत करण्यात आली. पुढील तीन दिवसांत कार्यकर्त्यांनी काय करावे याबद्दल प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मार्गदर्शन केले. सध्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.