

पणजी: राज्यात मागील दोन आठवड्यांपासून कडक उष्म्याचा प्रभाव जाणवत असून सूर्य जणू आग ओकत आहे. घामाच्या सतत धारा लागत असून असह्य उष्म्याने अंगाची लाही-लाही होत आहे. राज्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांवर पोहोचला असून पुढील चार-पाच दिवस हीच स्थिती कायम राहणार असल्याचे गोवा वेधशाळेने म्हटले आहे.
वाढते तापमान हा केवळ हवामानातील बदल नसून सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने योग्य काळजी घेण्याचा काळ असल्याचे आरोग्य संचालनालयाने म्हटले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि कडक उन्हात काम करणारे मजूर यांना उष्णतेचा सर्वाधिक धोका आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवणे, ही सरकारची प्राथमिकता असून आरोग्य यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे संचालनालयाने म्हटले आहे.
उद्या (गुरुवारी) राज्याच्या काही भागांत तुरळक पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. वाढत्या उष्म्यात नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. उष्माघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन आरोग्य संचालनालयाने केले आहे. आज पणजी येथे कमाल ३६.५ अंश सेल्सिअस तर किमान २७.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. सामान्य तापमानाच्या तुलनेत २.४ अंशांनी तापमान अधिक नोंदविले. कमाल आर्द्रता ८० टक्के नोंदविली.
जर तुम्हाला किंवा कोणालाही उष्माघाताची लक्षणे जाणवत असतील, तर उशीर न करता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. उष्माघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे. उष्माघाताच्या कोणत्याही आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी १०८ या रुग्णवाहिका क्रमांकावर संपर्क साधावा. ही सेवा २४ तास विनामूल्य उपलब्ध असून, वेळेवर उपचार देण्यासाठी ही रुग्णवाहिका सेवा सज्ज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.