
पणजी: राज्यात कायदा धाब्यावर बसवून सुरू असलेल्या ‘धीरयो’ला लगाम घालण्यासाठी सरकारने गांभीर्याने पावले उचलली आहेत. सर्व मालकांनी एका महिन्यात आपल्या बैलांना मायक्रोचीप बसवून त्यांची नोंदणी करावी. मायक्रोचीप न बसवलेले किंवा नोंदणी न केलेले बैल आढळून आल्यास त्यांची रवानगी गोशाळेत केली जाईल. तसेच बैलांच्या मालकांना ५० हजारांचा दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा देणारी नोटीस पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याने बुधवारी जारी केली.
राज्यात ‘धीरयो’वर बंदी असतानाही काही ठिकाणी खुलेआम, बेकायदेशीररीत्या बैलांच्या झुंजी लावल्या जातात. त्यात अनेक बैल गंभीर जखमी होतात, तर काही बैल मृत्युमुखी पडतात. असे प्रकार रोखण्यासाठी खात्याने हा निर्णय घेतल्याचे नोटिशीत म्हटले आहे.
आदेशात काय म्हटले आहे?
एका महिन्यात बैलाला मायक्रोचीप बसवून त्यांची नोंदणी करणे मालकांना अनिवार्य.
या निर्देशांचे पालन न केल्यास बैलांना गोशाळेत पाठवण्यासह मालकांना ५० हजारांचा दंड.
बैलांची नोंदणी न करणे हा धीरयोसाठी जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असे मानले जाईल.
‘धीरयो’च्या आयोजनास उच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. तरीही नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार जीत आरोलकर यांनी धीरयो कायदेशीर करावा, अशी मागणी सरकारकडे केली होती. इतर काही आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला होता.
आमदारांच्या या मागणीबाबत विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिले होते. पण आता त्याची पूर्तता होणे कठीणच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.