
पणजी: पेडण्यापासून काणकोणपर्यंतच्या जनतेने गोवा फॉरवर्डच्या जनता दरबारात मांडलेले प्रश्न, समस्या ऐकून मंत्री, आमदारांना जाग आली. हे सर्व प्रश्न आपण येत्या अधिवेशनात मांडणार असून, सरकारने ते न मांडू दिल्यास अधिवेशन संपताच पुन्हा लोकांकडे धाव घेऊ, असा इशारा आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी शनिवारी दिला.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील जनतेला अनेक प्रश्न छळत होते. त्यांचे प्रश्न, समस्यांकडे सरकारने पूर्णपणे कानाडोळा केलेला होता. त्यांचा आवाज ऐकून घेण्यास कुणीही तयार नव्हते.
त्यामुळेच आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जनता दरबारांचे आयोजन केले. या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत सुमारे २,८०० जणांनी मेलद्वारेही आपल्या समस्या मांडलेल्या आहेत. येत्या पावसाळी अधिवेशनात लोकांचे सर्व प्रश्न मांडून सरकारकडून त्यावर तोडगा काढून घेण्याचे आपले पूर्ण प्रयत्न असतील, असे सरदेसाई म्हणाले.
प्रश्नोत्तरे, शून्य प्रहर, लक्षवेधी सूचना, चर्चा आदींच्या माध्यमांतून आपण लोकांचे प्रश्न विधानसभा सभागृहात आणू. त्यात सरकारने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न केल्यास किंवा प्रश्न मांडू न दिल्यास अधिवेशन संपताच आपण पुन्हा जनतेच्या दरबारात पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बाराही तालुक्यांतील जनतेने जनता दरबाराच्या माध्यमातून पोहोचवलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवरही सरदेसाई यांनी प्रकाश टाकला.
‘रेंट अ कॅब’ हा राज्यातील फार मोठा घोटाळा आहे. अयोध्येवर चित्रपट काढू इच्छित असलेल्या मंत्र्याने ‘रेंट अ कॅब’च्या माध्यमातून दलाली करून लोकांना कोट्यवधींना लुटलेले आहे. या पैशांतून संबंधित मंत्री अयोध्येवर चित्रपट काढत असला, तरी पाप धुवून निघणार नाही, असा टोला सरदेसाई यांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचे नाव न घेता लगावला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.