
फोंडा: गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषिमंत्री रवी सीताराम नाईक (वय ७९) यांचे मंगळवारी रात्री ११.३०च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. फोंडा येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर , बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता खडपाबांध येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
नाईक यांच्या पुढाकारातून फोंडा नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम झाले. त्याचे उद्घाटन मंगळवारी झाले. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. सायंकाळनंतर त्यांची तब्येत अचानक खालावली.
त्यांना फोंड्यातील सावईकर इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. निधनाचे वृत्त सोशल मीडियावरून राज्यभर पसरताच रवींचे चाहते, हितचिंतक यांनी खड़पाबांध-फोंडा येथील निवासस्थानी गर्दी केली. 'धडाडीचा नेता, बहुजनांचा कैबारी हरपला', अशा उत्कट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रवी यांच्या पश्चात पुत्र नगरसेवक रितेश व रॉय, पत्नी पुष्पा, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.
१९७६साली फोंडा पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेलेले रवी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
जवळजवळ पन्नास वर्षे ते राजकारणात सक्रिय राहिले. त्यांनी अनेक विधायक निर्णय घेतले.
मुख्यमंत्री, खासदार ते विरोधी पक्ष नेत्यापर्यंत पदे भूषविली. ते एका दिवसाचे सभापतीसुद्धा होते.
२५ जानेवारी १९९१ ला ते प्रथम मुख्यमंत्री तर २ एप्रिल १९९४ ला दुसयांदा मुख्यमंत्री बनले.
एका गरीब घराण्यात जन्मलेले नाईक यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना नावाजलेले राजकारणी, राज्यकर्ते बनून यशाचे शिखर गाठले. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द गरजू व गरीब जनतेच्या उन्नतीसाठी वापरली. फोंडा व मडकई मतदारसंघात तर त्यांचे कार्य कालातीत राहील.
निराधारांसाठी दयानंद निराधार योजनेचा त्यांनी प्रारंभ केला. मुंडकारांना मालकी हक्क देण्यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले.
धनगर, वेळीप, कुणबी आणि गावडा जमातींचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश केला.
सूर काढणाऱ्या रेदेरांसाठी विमा योजना सुरू केली; १०० कम्युनिटी हॉल बांधले.
कला व संस्कृती खात्याची निर्मिती.
माजी मुख्यमंत्री, कृषी मंत्री रवी नाईक यांच्या निधनाने राजकीय परिधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वात गोव्यात प्रशासकीय स्थैर्य, ग्रामीण विकास आणि जनकल्याणाच्या अनेक योजना सुरू झाल्या. शांत स्वभाव, साधेपणा आणि प्रचंड जनसंपर्कामुळे ते सदैव आदरस्थानी राहिले. रवी नाईक यांचे गोवा राज्यासाठीचे योगदान अविस्मरणीय आहे.
प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.