

मडगाव: भाजपचा पराभव करण्यासाठी आणि गोव्याला एकत्र आणण्यासाठीच ‘गोवा फर्स्ट’ आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. काँग्रेस कदाचित फातोर्डा जिंकण्यासाठी निवडणूक लढवत असेल; पण आमचे लक्ष्य ‘गोवा’ हे आहे, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
‘गोवा फर्स्ट’ या आघाडीवर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी टीका केली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सरदेसाई म्हणाले, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून आलेल्या तीव्र प्रतिक्रियांवरून ही आघाडी आपला प्रभाव पाडत आहे, हे दिसून येते. आम्ही कोणत्याही ‘जॉइंट व्हेंचर’चा भाग नसून, जनतेच्या इच्छेचाच विजय होईल.
गोव्यातील जनतेच्या भावना आणि अपेक्षांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. जनतेला जे हवे आहे, तेच घडेल, निवडणुकीनंतर ते स्पष्ट होईल, असे सरदेसाई म्हणाले. निवडणुका अजून दूर असून आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे, असे सांगत सरदेसाई यांनी आम्ही टीकेचे स्वागत करण्यास तयार असल्याचे म्हटले.
गिरीश चोडणकर माझे मतदार; मी काहीही बोलणार नाही!
ज्यावेळी गोवा फॉरवर्ड काँग्रेसपासून दूर राहिला, त्यावेळी काँग्रेस पक्ष जास्त जागा जिंकतो, या गिरीश चोडणकर यांच्या वक्तव्यावर बोलताना सरदेसाई म्हणाले, ‘गिरीश चोडणकर हे माझे मतदार आहेत. त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आम्हाला उत्तर देण्याचा अधिकार आहे.’
२०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसबरोबर नव्हतो, त्यावेळी त्यांचे किती उमेदवार निवडून आले? असा सवाल करत गोमंतकीयांना जे हवे, तेच होणार हे निश्चित. जनतेच्या भावना ऐकण्यासाठी आमचे डोळे आणि कान सदैव खुले आहेत, असे सरदेसाईंनी सांगितले.
राजकारणात जनतेच्या भावनांची किती काळजी घ्यावी लागते, याची आम्हाला कल्पना आहे. गिरीश चोडणकर यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. गिरीश चोडणकर हे माझे मतदार आहेत आणि मला त्यांचे मत हवे आहे, असेही विजय सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.