

म्हापसा: भातशेतीवर लांबलेल्या कोरड्या दुष्काळाचे संकट घोंगावत असल्यामुळे हळदोणे येथील किटला भागातील पारंपरिक शेतकऱ्यांनी देवाचा धावा केला. गुरुवारी विशेष प्रार्थना पायी वारीचे आयोजन करून शेतकऱ्यांनी वेळेवर पाऊस पडू दे आणि पीक उत्तम येऊ दे, असे साकडे देवाला घातले.
विविध स्तरांतील शेतकऱ्यांचा सहभाग असलेली ही दिंडी दौझा वाडो चॅपलपासून सुरू झाली आणि पोस्तार येथील ‘होली क्रॉस’पर्यंत पोहोचली. यावेळी हातात प्रार्थनापत्रे घेतलेले भाविक मनोभावे भजने गात होते. त्यांनी ‘सेंट अँथनी’ची नवस-प्रार्थना केली आणि पिकांच्या संरक्षणासाठी तसेच अनुकूल हवामानासाठी देवाकडे दयायाचना केली.
सध्या पावसाने दडी मारल्यामुळे अनेक भातशेतीची खाचरे सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात यावर्षी पुन्हा एकदा मोठे नुकसान होण्याची भीती पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर ही विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली होती.
सुकलेली शेती पुन्हा हिरवीगार व्हावी, शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह सुरक्षित राहावा आणि यंदाचे पीक भरघोस यावे, यासाठी शेतकऱ्यांनी वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी साकडे घातले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.