डिचोली, कबुतर आणि अन्य पक्ष्यांचा उपद्रव टाळण्यासाठी डिचोली तालुक्यातील पिळगाव भागात यंदा ‘ट्रान्सप्लांटेशन’द्वारा खरीप भातशेती लागवड करण्यात येणार आहे. तसा निर्णय पिळगावमधील शेतकऱ्यांनी घेतला असल्याची माहिती विभागीय कृषी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर पिळगाव भागातील शेतकरी शेतीत उतरले आहेत. नांगरणी आदी मशागतीची कामे त्यांनी हाती घेतली आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतीत कबुतरांचा उपद्रव वाढला आहे. तरव्याची पेरणी केली की रुजून येणाऱ्या तरव्याची नासधूस कबुतरे आणि अन्य पक्ष्यांकडून करण्यात येते. त्यामुळे भात लागवडीवर खूप मोठा परिणाम होत आहे.
काबाडकष्ट, मेहनत वेळ जातो वाया
पक्ष्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या वर्षी पिळगाव भागात कबुतरांचा उपद्रव खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता. रुजून वर आलेल्या तरव्यावर कबुतरे तुटून पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा तरवा पेरण्याची वेळ येते. तसेच त्यांची मेहनतही वाया जाते.
कबुतरांचा उपद्रव टाळून तरव्याची राखण करण्यासाठी शेतकऱ्यांना सकाळी ते सायंकाळी काळोख पडेपर्यंत शेतीत पाळत ठेवावी लागली होती. हा उपद्रव आणि नुकसानी टाळण्यासाठी यंदा ‘ट्रान्सप्लांटेशन’द्वारा भातशेती लागवड करण्याचे शेतकऱ्यांनी ठरविले आहे. अशी लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी विभागीय कृषी कार्यालयाशी संपर्क साधला आहे.
- दीपक गडेकर, साहाय्यक कृषी अधिकारी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.