

पणजी: मान्सूनोत्तर पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात भातपिकाचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना ‘शेतकरी आधार निधी’ योजनेच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी फोटोसह अर्ज करण्याचे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आले आहे.
यासंदर्भात, कृषी संचालक संदीप फळदेसाई म्हणाले, की राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांची हानी झाली आहे त्यांच्या नुकसानीसंदर्भात सर्वेक्षण करण्याचे काम सोमवारपासून सुरु करण्यात आले आहे.
पुढील काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड नाही, अशा शेतकऱ्यांनीही भरपाईसाठी विभागीय कृषी कार्यालयात अर्ज करावेत. शेतकऱ्यांना पिकलेले भाताचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही फळदेसाईंनी सांगितले.
राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. ताळगाव भागातील शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच भात कापणी करून मळणी केली होती परंतु इतर भागांतील कापणी प्रलंबित होती, त्यामुळे बार्देश, डिचोली, सत्तरी, काणकोण, सांगे आदी भागात मोठ्या प्रमाणात भातपिकाचे नुकसान झाले आहे.
जवळपास ३० टक्के शेतकऱ्यांना मान्सूनोत्तर पावसाचा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे भातपीक कापणीस आले होते परंतु कामगार मिळत नसल्याने उशिर झाला, भात कापणीचे यंत्र मिळाले नसल्यानेही हानी झाली.
ज्या शेतकऱ्यांना मान्सूनोत्तर पावसामुळे नुकसानीला सामोरे जावे लागले आहे, अशा शेतकऱ्यांनी क्षेत्रीय कृषी कार्यालयात नुकसान झालेल्या शेतीच्या फोटोसह अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर कृषी अधिकारी शेतीला भेट देऊन पाहणी करून किती नुकसान झाले, याचा आढावा घेतील व त्यांनर प्रक्रिया पूर्ण करून खात्यात भरपाईची रक्कम जमा करण्यात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.