
निवृत्ती शिरोडकर
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या अबकारी खात्याच्या पेडणे अबकारी विभागामध्ये तब्बल दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. त्यासोबत पेडणे तालुक्यात अबकारी विभागाचे जे तीन चेकनाके किरणपाणी-आरोंदा, न्हयबाग, बांदा-पत्रादेवी या ठिकाणी आहेत ते चेकनाकेही सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
एका हाताने कधी टाळी वाजत नाही. एक कारकून तब्बल दोन कोटी रुपयांचा घोळ एकटा करूच शकणार नाही. त्यामध्ये त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही तेवढाच सहभाग असणार आहे. त्या नजरेतून निस्वार्थीपणे चौकशी करणे आवश्यक आहे. दोन कोटींचा गैरव्यवहार पेडणे तालुक्यामधून होणे ही शासकीय कार्यालयात घडणारी पहिलीच घटना आहे आणि अशी प्रकरणे पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात घडतात.
अबकारी विभागाचा पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 वर बांदा-पत्रादेवी हा महत्त्वाचा चेकनाका आहे. त्याशिवाय त्याच्याच बाजूला अंतर्गत रस्त्यावर जाणारा जोडूनच चेकनाका न्हयबाग-पोरस्कडे येथे आहे. तर तिसरा चेकनाका किरणपाणी-आरोंदा या ठिकाणी आहे. या तिन्ही चेक नाक्यांवरून मोठ्या प्रमाणात दारूची निर्यात केली जाते. गोव्यातून होणारी लाखो-करोडो रुपयांची दारूची ही चोरटी वाहतूक महाराष्ट्रातील चेकनाक्यांवर पकडली जाते. मग गोव्यातील या चेकनाक्यांवर ही वाहने का सापडत नाहीत? असा प्रश्न पडत आहे.
पहाटेपर्यंत दारूविक्री
राष्ट्रीय महामार्ग असो, गावातील शहरातील एक घाऊक दारू विक्रेते आहेत, त्या दारू विक्रेत्यांना ठरावीक वेळ घालून दिलेली असते. परंतु हे घाऊक विक्रेते मध्यरात्रीच नव्हे तर काही ठिकाणी पहाटेपर्यंत दुकाने चालू ठेवतात. त्या ठिकाणी घाऊक नव्हे तर किरकोळ विक्री होते. आणि या प्रकाराची पूर्णपणे माहिती अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना असते; परंतु हे अधिकारी वेगळाच अर्थपूर्ण समझोता करून दुर्लक्ष करतात..
यामागचे गुपीत काय?
मागच्या चार वर्षांपूर्वी लक्ष्मी नामक अशाच एका महिला अधिकाऱ्याने सलगपणे तीन-चार वेळा छापे टाकून वाहने आणि लाखो रुपयांची दारू पकडली होती. त्यानंतर तिची लगेच बदली झाली. चेकनाक्यावर किंवा पेडणे अबकारी कार्यालयांमध्ये जे अधिकारी चांगले काम करतात ते टिकत नाहीत. मात्र, काही कर्मचारी जे दहा-पंधरा वर्षांपासूनही एकाच जाग्यावर चिकटून आहेत, त्यांचे गुपीत मात्र कोणाला कळत नाही.
असा चालतो गोलमाल...
पत्रादेवी येथील चेकनाक्यावर जी वाहने ये-जा करतात त्या वाहनांची योग्य पद्धतीने तपासणी केली जात नाही. राज्यातून परराज्यात जाणाऱ्या वाहनांमध्ये कसल्या प्रकारचे साहित्य आहे याची तपासणी केली जात नाही.
त्या वाहनांमधील एखादा वाहनचालक किंवा क्लीनर खाली उतरतो. त्याच्या हातामध्ये पैसे असतात. मात्र, आवश्यक असलेली कागदपत्रे त्यावेळी दाखविली जात नाहीत.
संबंधित व्यक्ती सरळ वाहनातून उतरून पत्रादेवी चेकनाक्यावर जाते. त्या ठिकाणी एक डबा ठेवलेला असतो. त्या डब्यामध्ये ती नोट घालतो आणि सरळ परत वाहनात चढतो. नंतर वाहन सुसाट निघून जाते.
त्या वाहनांमध्ये कागदपत्रांवर लिहिलेले साहित्य आहे की आणखी भलतेच काही आहे. याची तपासणी कधीतरी होते. हा प्रकार सर्रास चालू आहे.
या चेकनाक्यावर आपली निवड व्हावी, यासाठी राज्यकर्त्यांचे पाय धरणारे अधिकारी अनेक आहेत. एखादा अधिकारी जर प्रामाणिक काम करेल, तर त्याची मात्र लगेच बदली केली जाते.
हप्ता वसुलीचा आरोप
किनारी भागातील शॅक्स रिसॉर्ट व्यावसायिकांकडे संपर्क साधला असता, एका शॅक व्यावसायिकाने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले की, दर चार दिवसांनी अबकारी खात्यातील एक अधिकारी आमच्याकडे येऊन वेळोवेळी वसुली करत असतो. जर त्याची मागणी आम्ही मान्य केली नाही तर तुमचे परवानेही आम्ही रद्द करू, दारू विक्री करू देणार नाही, अशा धमक्या तो अबकारी अधिकारी देतो.
पेडणेतील अबकारी खाते नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. चेकनाके तर मलिदा कमविण्याचे साधन झाले आहेत. सरकारने कसून चौकशी करावी.
उमेश तळवणेकर, पेडणे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.