

पणजी: मधुमेहींच्या रुग्णांत देशात आघाडीवर असलेल्या गोव्यात दरवर्षी मधुमेहींची संख्या वाढतच आहे. सद्यस्थितीत राज्यात दरदिवशी सरासरी ६७ रुग्ण सापडत असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
२०२३–२४ ते २०२५–२६ या तीन वर्षांच्या काळात राज्यातील इस्पितळांमध्ये मधुमेहासंदर्भात २,८६,२०७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ७२,९१६ जणांना मधुमेहाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
तर, त्यापैकी ७२,८८३ जणांवर उपचार सुरू असल्याचे जाधव यांनी उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. ३ वर्षांच्या काळात निदान झालेल्या ७२,९१६ जणांचा विचार केल्यास दरदिवशी सरासरी ६७ जणांना मधुमेहाची लागण होत असल्याचे स्पष्ट होते.
राज्यात मधुमेहींची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
गोव्यासह देशभरात वाढत असलेल्या मधुमेही रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार विविध पावले उचलत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (एनएचएम) सर्वच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान करत आहे. मधुमेहावरील नियंत्रणासाठी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे, इस्पितळांमध्ये अधिकाधिक मनुष्यबळाची नेमणूक करणे, मधुमेहाचा संशय असलेल्या रुग्णांची तत्काळ तपासणी, चाचणी आणि त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असेही मंत्री जाधव यांनी उत्तरात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.