

वास्को: राज्यात गुन्हे शाखेने राबविलेल्या पडताळणी मोहिमेत एकही बांगलादेशी नागरिक आढळला नसल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र, या निष्कर्षाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत, असे आंतरराष्ट्रीय बजरंग दल गोवाचे नितीन फळदेसाई यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. अनेक अवैध घुसखोरांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र यांसारखी विविध कागदपत्रे उपलब्ध असल्याची उदाहरणे देशभरात समोर आली आहेत.
त्यामुळे केवळ अशा कागदपत्रांच्या आधारे नागरिकत्व निश्चित करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आधार कार्ड हे ओळखपत्र असले तरी ते भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही. त्याचप्रमाणे मतदार यादीतील नाव किंवा रेशन कार्ड असणे, यावरूनही नागरिकत्व निश्चित होत नाही. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटविण्यासाठी अधिक सखोल व वैज्ञानिक तपासाची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांनी संशयित व्यक्तींची मूळ जन्मनोंद, कौटुंबिक पार्श्वभूमी, पूर्वीचे वास्तव्य, स्थलांतराचा इतिहास तसेच इतर राज्ये व केंद्रीय यंत्रणांकडील माहिती यांची पडताळणी करावी. गोव्याची सुरक्षा, सामाजिक स्थैर्य आणि स्थानिक नागरिकांचे हित लक्षात घेऊन हा विषय अत्यंत गांभीर्याने हाताळला गेला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील अवैध घुसखोरांची ओळख पटविण्यासाठी विशेष मोहीम राबवून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गोव्याच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.