
पणजी: राज्यातील महिलांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी भयानक आहे. २०२१ मध्ये १२८ पैकी केवळ १६ टक्के प्रकरणांमध्येच गुन्हेगारांना शिक्षा झाली. २०२२ मध्ये २१२ पैकी फक्त १३ टक्के प्रकरणांमध्ये तर २०२३ मध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण एक अंकी एवढे खाली आले. यावरून राज्यातील गुन्हेगारीचे हाताबाहेर कशी जात आहे, हे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्र्यांकडील २५ खात्यांपैकी १० खात्यांवरील मागण्या आणि कट-मोशनवर सरदेसाई बोलत होते. त्यांनी सुरवातीलाच पाण्याच्या प्रश्नाला हात घातला. ते म्हणाले, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन या वर्षात १७० जणांचा मृत्यू झाला आहे, म्हणजे ३२ तासांत एकाचा जीव जातोय.
बोरी पुलावरून दररोज ३५ हजार वाहने ये-जा करतात. या पुलाच्या दुरुस्तीचे काम दिले आहे काली पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गावांना जोडणाऱ्या पुलांच्या सुरक्षेविषयी ऑडिट होणे आवश्यक आहे. काणकोण बायपाससाठी ९५२.२३ कोटींच्या कामांसाठी २२ कंत्राटदार आहेत.
त्या कामासाठी एकही स्थानिक कंत्राटदार नाही किंवा सरकारला गोव्यातील कंत्राटदार नको आहे असेच दिसते, असाही टोमणा सरदेसाई यांनी मारला. दरम्यान, रुमडामळ पंचायतीवर आपली सत्ता आणण्यासाठी भाजप तारेवरची कसरत करत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
आमोणा येथील एक महिलेने फातोर्डा येथील एका महिलेकडून २० टक्के व्याजाने ९० हजार रुपये घेतले. त्यानुसार ती २० महिने व्याज भरत राहिली. त्यानंतर त्या महिलेने सर्व पैसे देतो म्हणून सांगितले; पण तिच्याकडून साडेचार लाखांची वसुली केल्याचा प्रकार घडला. अशा प्रकारे अनेक महिलांना तिने अधिक व्याजाने पैसे देऊन वसुली करण्याचे प्रकार घडले असल्याकडे विजय सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.