
पणजी: गणेश चतुर्थीदरम्यान राज्यातील नारळांच्या दरात भरमसाट वाढ झाली होती. या वाढत्या दराला आळा घालण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना रास्त दरात नारळ मिळावा यासाठी फलोत्पादन महामंडळाने नारळ विक्रीला सुरुवात केली, त्याला उत्तम प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत एक लाख नारळांची विक्री करण्यात आल्याचे गोवा फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापक डॉ. चंद्रहास देसाई यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
देसाई म्हणाले की, आता राज्यातील नारळाचा पाडा झालेला आहे तसेच मार्केटमध्ये नारळाचे दर आवाक्यात आलेले आहेत, तरीदेखील फलोत्पादन महामंडळाच्या स्वतःच्या आल्तिनो, पणजी मार्केट, म्हापसा या ठिकाणी नारळांची विक्री सुरूच राहणार आहे.
दरम्यान, पणजी बाजारात आता चतुर्थीनंतर नारळांचे दर आवाक्यात आले असून मध्यम आकाराचा नारळ ३० ते ३५ रुपये, मोठा नारळ ५० रुपये दराने विकला जात आहे. इतर भाज्यांच्या दरातही काही प्रमाणात घट झाली आहे.
बाजारात कांदे ५० रुपये किलो दराने विकले जायचे आता ४० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. फलोत्पादनच्या गाळ्यांवर बाजारातील भाज्यांच्या तुलनेत १० ते २० टक्के दर कमी आहेत.
फलोत्पादनच्या रास्त दरातील भाज्या राज्यांतील अनेक ठिकाणी असलेल्या गाळ्यांद्वारे विकले जातात. हे गाळे अनेक व्यक्ती चालवत असतात. तेथे नारळ विक्री करण्यास ते इच्छुक आहेत का? त्यांना त्याची आवश्यकता आहे का? यासंबंधी आज (मंगळवारी) बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर जर गाळ्यांवर विक्री करण्यास गाळेधारक इच्छुक असल्यास मागणीनुसार विक्री करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.