
Goa CM statement on Canacona attack: सामाजिक कार्यकर्ते राम काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण गोव्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, गोव्याच्या शांतताप्रिय वातावरणात कोणत्याही प्रकारची गुंडगिरी सहन केली जाणार नाही. या हल्ल्यामागे असलेल्या सर्व दोषींना अटक करून त्यांना गोव्यातून हद्दपार केले जाईल, अशी ठोस भूमिका त्यांनी घेतलीये.
या हल्ल्यातील अनेक आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली असून, इतरांचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला कायद्यानुसार कठोर शासन केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. "गोवा अशा प्रकारच्या हिंसेला कधीही थारा देणार नाही. ही गुंडगिरी संपवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे," असे ते म्हणाले. या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव पाहता, मुख्यमंत्र्यांनी तातडीने काणकोणकर यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) येथे भेट घेतली.
त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांनी सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्याचे सांगितले आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे स्पष्ट केले. या हल्ल्यानंतर काणकोणकर आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवण्याची मागणी त्यांच्या पत्नीने केली होती, जी सरकारने मान्य केली असून पोलीस संरक्षण पुरवले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेवर गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा हिंसक घटनांमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. "गोवा सरकार पर्यटन-स्नेही राज्य म्हणून आपली प्रतिमा जपण्यास प्रयत्नशील आहे आणि मला विश्वास आहे की ते पर्यटकांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करतील," असे राज्यपाल म्हणालेत. शांतता आणि सुरक्षितता ही गोव्याची ओळख आहे, अशा घटनांमुळे ही ओळख डागाळू नये, यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या हल्ल्याच्या निषेधार्थ पणजीमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्ष नेते आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन सरकारला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या वाढत्या दबावानंतरच सरकारने कठोर भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास केवळ हल्लेखोरांवरच मर्यादित नसून, हल्ल्यामागचा नेमका हेतू काय होता, याचाही सखोल तपास केला जाईल.
या घटनेने गोव्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, पुढील काळात सरकार या प्रकरणावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारची ही भूमिका किती प्रभावी ठरते, हे येणारा काळच ठरवेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.