

साखळी: ‘विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता शेतकऱ्यांसोबत काम करणे आवश्यक आहे. बाहेरील खाद्यपदार्थ व खतांच्या अती वापरामुळे कॅन्सर, कीडनी आजारांत वाढ होत आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिकाऱ्यांचे कान पिळले.
गोवा (Goa) सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध कृषी अनुदानांची रक्कम अर्ज केल्यानंतर केवळ दोन महिन्यांत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असून कृषी व वित्त खात्याने त्यादृष्टीने प्रक्रिया गतिमान करावी, असे निर्देश सावंत यांनी दिले.
कृषी खात्यातर्फे साखळी येथील रवींद्र भवनात आयोजित ‘कृषी पे चर्चा’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, कृषी खात्याचे सचिव निखिल देसाई, कृषी संचालक चंद्रहास देसाई, आयसीएआरचे संचालक प्रवीण कुमार, नाबार्डचे संदीप धारकर, अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात एका शेतकऱ्याने सरकारी ट्रॅक्टर चालक शेतात कामासाठी येत नसल्याची तक्रार केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित चालकाचे नाव द्या, त्याला तातडीने निलंबित करण्याची कारवाई करू, असा इशारा दिला. शेतकऱ्यांची कामे अडविणाऱ्या किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१. राज्यातील सुमारे १८ हजार हेक्टर खाजन शेती पुनर्जीवित करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून त्यासाठीचा सविस्तर आराखडा जागतिक बँक आणि नीती आयोगाकडे सादर करण्यात आला आहे.
२. प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल ओळखपत्र देण्याची योजनाही सुरू आहे. त्याद्वारे लागवड, पीक नियोजन आणि तांत्रिक मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.