
मडगाव: भाजपच्या वतीने गोव्यात संविधान हत्या दिवस साजरा करण्यात आला. आणीबाणीच्या काळात देशात जबरदस्तीने नसबंदी लागू करण्यात आल्याचे सावंत म्हणाले. यात अनेक पिढ्यांचे नुकसान झाल्याचे नमूद करताना त्यांनी काँग्रेससवर टीका केली. मडगावातील कारे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात सावंत बोलत होते. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत उपस्थित होते.
संविधानाची हत्या का आणि कशी झाली तसेच ती पुन्हा केव्हा होऊ नये यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आली होती. माध्यमांवर बंधने घातली होती, पण सध्या तशी परिस्थिती नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
विरोधपक्षनेत्याला अटक करण्यात आली. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत इंदिरा गांधी यांच्याविरोधात भाष्य करणाऱ्यांना अटक केली जात होती. लोकांचा आवाजच बंद करण्यात आला होता. नागरिक घाबरुन घाबरुन जगत होते. गोवा स्वातंत्र्य होऊन केवळ १३ – १४ वर्षे झाली होती. आरएसएस, एबीव्हीपी आणि राष्ट्रवादी नेते (दादा आर्लेकर, राजेंद्र आर्लेकर, दत्ता भिकाजी नाईक, प्रभाकर सिनारी यांना अटक करण्यात आली.) स्वातंत्र्य सैनिकांना देखील अटक करण्यात आली.
गोव्यातील माध्यमांना देखील लक्ष्य करण्यात आले. आणीबाणीच्या काळात गोव्यात अनेक गोष्ट घडत होत्या, राष्ट्रमत या वृत्तपत्रावर त्यावेळी बंदी घालण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात सर्वात मोठे आंदोलन मडगाव येथे झाले होते.
आणीबाणीच्या काळात जबरदस्तीने लागू करण्यात आलेल्या नसबंदीने लोकांना ‘ब्रिटीश बरे होते’, असे म्हणण्यास भाग पाडले. ब्रिटीशांनी देखील असा प्रकार केला नव्हता. लोकसंख्या नियंत्रणाच्या नावाखाली नसबंदीचा प्रकार करण्यात आला होता. याच्या अंमलबजाणीचे काम संजय गांधी यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यावेळच्या लोकांची मानसिकता काय असेल याचा विचार करा, असे प्रमोद सावंत म्हणाले.
यात अनेक पिढ्यांना त्रास सहन करावा लागला. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात आले.
"१९७८ मध्ये जनता पार्टीने गोव्यात चार जागा लढवल्या होत्या. मडगाव, पणजी, वास्को आणि पाळये येथे जनता पक्षाचे उमेदवार होते. पाळीये जागा माझ्या वडिलांनी लढवली होती. आणीबाणीत लढा दिल्यानंतर त्यांना निवडणूक लढविण्याची विनंती करण्यात आली होती. त्यांना केवळ ४०० मते पडली व त्यांचा पराभव झाला. पण, त्यानंतर ४० वर्षे लोकांना माझ्या वडिलांना जनता पार्टीचे म्हणून लोकांनी हिणवले, मी आमदार झाल्यानंतर ते बंद झाले," असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
"बायबल आणि कुराण यांना धर्मात जेवढे महत्व आहे तेवढेच देशात संविधानाला महत्व आहे. भारत युनियन ऑफ स्टेट्स आहे. देशात पहिल्यांदा न्यायपालिका, लोकायुक्त यांना सक्षम करण्याचे काम या सरकारमध्ये झाले. ३७० कलम रद्द करण्याचे काम माझ्या सरकारने केले. २०१३ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकविण्यासाठी भाजपचे नेते गेल्याचे मी पाहिले आहे. तिरंगा असलेल्या नागरिकांना अटक केली जात होती हेही मी पाहिलंय. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या विचारावर चालणारा भाजप आहे," असे सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.