

म्हापसा: अखंड भारताचे स्वप्न पाहण्याकरिता, आम्ही राजकारणात आलो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आले. ज्यामुळे भारताच्या अखंडतेला बळकटी मिळाली. हे स्वप्न सत्यात उतरल्याने मला तीव्र आनंद झाला. त्याचप्रमाणे स्वतःच्या करिअरसोबतच, देशाच्या विकासात, आपण योगदान देणार ही भावना बाळगून युवकांनी राजकारणात उतरावे. प्रत्येकाने स्वतःमधील पुढारी जागा करुन, नेतृत्वाची भूमिका स्वीकारावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी युवकांना ‘भारत २०४७ युवा परिषदेत’ आपले मनोगत व्यक्त करताना केले.
भारताचे २०४७ पर्यंत विकसित राष्ट्राचे स्वप्न हे युवकांशिवाय अशक्य आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वाची गरज आहे. खासगी, आर्थिक, सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात, युवकांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन सावंत यांनी युवकांना केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, मुळात भाजपात परिवारवाद नाही. जो कार्यकर्ता काम करतो, त्याला संधी मिळते. कार्यकर्ता स्तरावरुन मी काम सुरु केले, ज्याची पक्षाने दखल घेतली. २००८मध्ये मी पहिल्यांदा पोटनिवडणूक लढविली. तिथे पराभव झाला. तरीही, माझे समाजकार्य चालूच राहिले. त्यानंतर २०१२मध्ये पक्षाने मला पुन्हा संधी दिली. भाजप काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी नक्की देतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
डॉ. सावंत म्हणाले की, गेल्या सात वर्षांत गोव्यातील पायाभूत सुविधा तसेच मानवी विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मोपा विमानतळ असो किंवा पेडणे ते काणकोणपर्यंत महामार्गाचे रुंदीकरण, वाढीव पर्यटन क्षेत्रातील दर्जेदार पायाभूत सुविधा, सुपरस्पेशलिटी इस्पितळ, आयुष्य इस्पितळ तसेच विविध शैक्षणिक संस्थांची निर्मिती याच काळात झाल्याचे त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.