

पणजी: चिखली येथे 60 वर्षीय कृष्णा (शांगो) नाईक यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली मारहाण ही केवळ एका व्यक्तीवरील हल्ल्याची घटना नसून, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर बोट ठेवणारी घटना ठरत आहे. सण-उत्सवाच्या वातावरणात भररस्त्यावर आणि स्वतःच्या घरासमोर एखाद्या नागरिकावर हल्ला होतो, त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या नातेवाईकांनाही मारहाण केली जाते आणि अखेरीस एका व्यक्तीचा जीव जातो, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
चिखली मानसीवाडा येथे बुधवारी (24 जून) रात्री दारुच्या नशेत धुंद तरुणांनी कृष्णा यांना मारहाण केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता नागरिक आपल्या घरासमोरही सुरक्षित नसल्याची टीका समाजमाध्यमांवर होऊ लागली. समाजात गैरप्रकारांविरोधात आवाज उठवण्याचे, जाब विचारण्याचे आणि आपल्या परिसरातील शांतता टिकवून ठेवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला असते, मात्र अशा घटना पाहता, हे स्वातंत्र्य आता धोक्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जुन्या वादातून आणि कथित नशेच्या अंमलाखाली झालेल्या हिंसाचाराने एका कुटुंबाचा आधार हिरावला, तर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. गोव्यात (Goa) गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. कायद्याचा धाक कमी होत असल्याची चर्चा वारंवार पुढे येत असताना, अशा घटना त्या चिंतेला अधिक बळ देतात. नागरिकांनी शांततेने आणि कायद्याच्या चौकटीत राहून मांडलेला प्रश्न जर हिंसक प्रत्युत्तराने दडपला जात असेल, तर ती लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली पाहिजे.
आपल्या घरासमोर घडणाऱ्या गैरप्रकारांबाबत जाच विचारणेही धोकादायक ठरत आहे का? सण-उत्सवाच्या वातावरणात वाढता हिंसाचार रोखण्यात यंत्रणा कमी पडते आहे का?
कायद्याचा धाक कमी झाल्याने गुन्हेगार अधिक बेधडक होत आहेत का?
सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी नेमकी कोण देणार?
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.