
पणजी: गोव्यात 2022 पासून आतापर्यंत 1700 हून अधिक रस्ते अपघात झाले असून त्यात 843 लोकांचा मृत्यू झाला, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. आमदार कार्लोस फेरेरा आणि दाजी साळकर यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही आकडेवारी सादर केली. 2025 या वर्षात आतापर्यंत 135 लोकांचा अपघाती मृत्यू झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अपघातांचे मुख्य कारण रस्त्यांची खराब गुणवत्ता नाही, तर बेदरकारपणे आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे हेच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. रस्त्यांच्या स्थितीमुळे अपघात होतात, हा दावा त्यांनी फेटाळून लावला.
सरकारने राज्यभरात 43 'ब्लॅक स्पॉट' (अपघातप्रवण क्षेत्रे) निश्चित केले आहेत. ही अशी ठिकाणे आहेत, जिथे रस्त्यांची रचना खराब आहे किंवा ती जास्त वेगाच्या क्षेत्रांमध्ये येतात. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) सहकार्याने या 'ब्लॅक स्पॉट'वर सुरक्षितता सुधारण्यासाठी काम सुरु असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वाढते अपघात (Accident) आणि मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नियमितपणे अंमलबजावणी मोहिम राबवत आहे. या वर्षात आतापर्यंत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याबद्दल 2,600 हून अधिक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल 2,586 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी भर दिला की, या वाढत्या मृत्यूंना आळा घालण्यासाठी नियमित अंमलबजावणी आणि जनजागृती मोहिम राबवल्या जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.