

पणजी: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना ‘एआय’ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्वयंचलित ई-चलन देण्याच्या व्यवस्थेची अंमलबजावणी शनिवार (ता. १)पासून राज्यात सुरू होणार आहे. राज्यातील २६ ठिकाणी बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांद्वारे ही कारवाई केली जाणार असून, संपूर्ण प्रक्रिया मडगाव येथील नियंत्रण कक्षातून ऑनलाइन राबविली जाईल, अशी माहिती वाहतूक खात्याचे संचालक अरविंद खुटकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली.
वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी जाहीर केल्याप्रमाणे ‘एआय’ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांना ई-चलन पाठविले जाणार आहे. सध्या सर्व प्रक्रिया मडगाव येथील नियंत्रण कक्षातून पार पडणार असून, उत्तर गोव्यातील नियंत्रण कक्ष सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
खुटकर यांनी सांगितले की, चाचणी कालावधीत दररोज ४० ते ५० हजार वाहतूक नियमभंगाच्या घटना निदर्शनास येत होत्या. मात्र, १ ऑगस्टपासून ई-चलनाची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर वाहनधारकांमध्ये जागरूकता वाढली असून, नियमभंगाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
मागील काही दिवसांत ही संख्या दिवसाकाठी सुमारे एक हजारांपर्यंत खाली आल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.दरम्यान, अंमलबजावणीपूर्वी वाहतूक खात्याच्या संचालनालयात वाहतूक व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे.दंड वसूल करणे हा उद्देश नसून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन घडवून आणणे.राज्यातील २६ ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण; प्राथमिक टप्प्यात ९२ कॅमेरे कार्यरत. हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर आदी नियमभंग ‘एआय’ कॅमेऱ्यांद्वारे नोंदविले जाणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.