Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

Morjim Beach Glass Waste: गोव्यातील निसर्गरम्य किनारे हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत, मात्र अलीकडच्या काळात या किनाऱ्यांची दुर्दशा होताना दिसत आहे.
Morjim Beach Glass Waste
Morjim Beach Glass WasteDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील निसर्गरम्य किनारे हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत, मात्र अलीकडच्या काळात या किनाऱ्यांची दुर्दशा होताना दिसत आहे. प्रसिद्ध टेक यूट्यूबर 'गिकी रणजित' यांनी नुकतेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर गोव्यातील मोरजी बीचचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात काचेच्या बाटल्यांचे तुकडे विखुरलेले दिसत आहेत. काही तुकडे तर थेट पाण्याखाली लपलेले असल्याने पर्यटकांच्या पायाला गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नागरिकांचा निष्काळजीपणा

यूट्यूबर रणजित यांनी आपल्या पोस्टमध्ये संताप व्यक्त करताना म्हटले आहे की, त्यांनी स्वतः समुद्रकिनाऱ्यावर चालताना ८ ते ९ काचेचे तुकडे गोळा केले. "लोकांना नक्की काय झाले आहे? काचेचे तुकडे वाळूत किंवा पाण्याखाली लपलेले असतात, ज्यामुळे कोणाचाही पाय कापला जाऊ शकतो. आपण इतके बेजबाबदार कसे असू शकतो?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर टीकेचा पाऊस पडला असून, नागरिकांच्या 'सिव्हिक सेन्स' बद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Morjim Beach Glass Waste
Goa Water Crisis: चिखली-कोलवाळ परिसरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थ संतप्त, पाणीपुरवठा विभागाकडून नवीन जलवाहिनीचे काम सुरू

पायाभूत सुविधांचा अभाव की लोकांची मानसिकता?

या घटनेनंतर पर्यटनाच्या ठिकाणी असलेल्या पायाभूत सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रणजित यांनी पुढे स्पष्ट केले की, समुद्रकिनाऱ्यावर कचरा तर सर्वत्र पसरलेला आहे, पण तो टाकण्यासाठी कचराकुंडी शोधणे ही मोठी कसरत ठरत आहे.

जर प्रशासनाने योग्य ठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या असत्या, तर ही परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रित करता आली असती. तथापि, अनेकांच्या मते, केवळ सुविधा देऊन चालणार नाही, तर पर्यटकांची वैयक्तिक जबाबदारी आणि निसर्गाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे.

Morjim Beach Glass Waste
Goa Crime: सॅम्युअलचा बळी नक्की कोणामुळे?यंत्रणेवरच्या विश्‍वासाचा 'कचरा'!

पर्यावरणाला आणि वन्यजीवांना गंभीर धोका

काचेचे हे तुकडे केवळ पर्यटकांसाठीच नव्हे, तर समुद्रकिनाऱ्यावरील जीवसृष्टीसाठीही घातक ठरत आहेत. वाळूत मिसळलेले काचेचे हे धारदार तुकडे प्राणी आणि पक्ष्यांच्या पायांना इजा पोहचवू शकतात. याशिवाय, हे प्रदूषण समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्यही नष्ट करत आहे.

लहानपणापासूनच शालेय स्तरावर स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणच्या जबाबदारीचे संस्कार होणे गरजेचे असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. पर्यटनाच्या नावाखाली निसर्गाची होणारी ही विटंबना थांबवण्यासाठी आता कडक नियमावलीची आणि जनजागृतीची नितांत गरज निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com