
Ganesh Visarjan Mapusa: गणेश विसर्जनावेळी म्हापसा येथे रविवारी (31 ऑगस्ट) रात्री एक मोठी दुर्घटना टळली. दृष्टी मरीनच्या लाईफसेव्हरने एका गणेश भक्ताला पाण्यातून बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. पाण्याच्या प्रवाहात तो वाहत जात असताना वेळेत केलेल्या या बचावकार्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. या घटनेने गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर तैनात करण्यात आलेल्या विशेष लाईफसेव्हर पथकाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, ही घटना रविवारी रात्री अंदाजे साडेनऊच्या सुमारास म्हापसा (Mapusa) तार येथे घडली. कर्नाटक राज्यातील हुबळी येथील 38 वर्षीय व्यक्ती गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी आलेल्या कुटुंबासोबत होता. विसर्जनासाठी वापरलेले लाकडी ‘पाट’ पाण्यातून वाहून गेल्याने तो परत आणण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पाण्याच्या प्रवाहाची ताकद त्याच्या लक्षात आली नाही. पाण्याचा जोरदार प्रवाह त्याला ओढू लागला. त्यामुळे तो घाबरला आणि मदतीसाठी आरडाओरड करु लागला.
त्याचवेळी, घटनास्थळावर ड्युटीवर असलेले दृष्टी मरीनचे लाईफसेव्हर राकेश कुमार यांनी त्वरित परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी मारली. राकेश कुमार यांनी बुडणाऱ्या व्यक्तीला पकडून सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. वेळेत आणि अत्यंत कुशलतेने केलेल्या या बचावकार्यामुळे त्याचा जीव वाचला आणि त्याला कोणत्याही वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासली नाही.
गणेश विसर्जनाच्या गर्दीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दृष्टी मरीनने राज्यभरात विशेष लाईफसेव्हर पथके तैनात केली आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कंपनीने एकूण 47 विसर्जन स्थळांवर प्रशिक्षित लाईफसेव्हर नियुक्त केले आहेत. यामध्ये गोव्यातील 35 समुद्रकिनाऱ्यांचा आणि 12 अंतर्गत जलस्थळांचा समावेश आहे.
केवळ एका दिवसासाठीच नाही, तर गणेशोत्सवाच्या उर्वरित विसर्जन तिथींसाठीही दृष्टी मरीनने आपली तयारी केली आहे. 2, 4, 6 आणि विशेषतः 17 सप्टेंबर रोजी (21व्या दिवशीच्या विसर्जनावेळी) मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. या सर्व दिवशी भाविकांना सुरक्षित विसर्जन करता यावे यासाठी दृष्टी मरीनचे लाईफसेव्हर विविध ठिकाणी तैनात राहणार आहेत.
मूर्ती विसर्जनादरम्यान सुरक्षित पद्धतींचा अवलंब सुनिश्चित करण्यासाठी दृष्टी मरीनचे हे प्रशिक्षित पथक रात्री उशिरापर्यंत नियुक्त केलेल्या ठिकाणी तैनात राहतील. या प्रयत्नांमुळे गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा करणे शक्य झाले आहे. म्हापसा येथे घडलेली ही घटना सुरक्षा दलांच्या सतर्कतेचे उत्तम उदाहरण आहे. अशा बचावकार्यांमुळेच धार्मिक विधी आणि सणासुदीच्या काळात लोकांच्या सुरक्षिततेची खात्री पटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.