

फोंडा : कण्णेव्हाळ - बेतोडा येथील गव्या रेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन मृत झालेल्या पोलिस खात्यातील गृहरक्षक दिनेश गावडे याच्यावर खरेच गव्याने हल्ला केला होता काय? यासंबंधी वन खात्याने उपस्थित केलेल्या शंका अखेर फोल ठरल्या. आज बुधवारी ज्या ठिकाणी गव्याने दिनेशवर हल्ला केला त्या जागेची संबंधित तज्ज्ञ डॉक्टर अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
फोरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. मधू घोडकिरेकर तसेच कुर्टीतील फोरेन्सिक सायन्स विद्यापीठाच्या वाईल्डलाईफ प्राध्यापक डॉ. स्वेता निधी, साईंटिफिक ऑफिसर डॉ. डोवा नानी, मडगाव जिल्हा इस्पितळाचे फोरेन्सिक विभागाचे कनिष्ठ कन्सल्टंट डॉ. दिव्यांशू शर्मा, पोलिस निरीक्षक मोहन गावडे आणि वन खात्याचे वनाधिकारी दीपक तांडेल आदी गेले होते.
ज्या जागेवर हा हल्ला झाला, त्या जागेची पाहणी करण्यासाठी पोलिस तसेच फोरेन्सिक विभागाचे डॉक्टर्स गेले, तरी वन खात्याकडून वनाधिकारी सोडल्यास अन्य कोणताही तज्ज्ञ माणूस आला नाही, शेवटी पाहणीअंती आणि प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार गव्यानेच दिनेश गावडे याच्यावर हल्ला केल्यावर शिक्कामोर्तब करून वन खात्याचे सर्व दावे फेटाळून लावण्यात आले, त्यामुळे वन खात्याचा शेवटी फुसका बार ठरला.
यावेळी फोरेन्सिक विभागाने पुन्हा एकदा पाहणी केली त्यात गव्यानेच हल्ला केल्याचे स्पष्ट केले. हल्ला झाला ती जागा उतरणीला असून या जागेवरूनच रानटी प्राणी खाली असलेल्या ओहोळाचे पाणी पिण्यासाठी जातात, असेही स्थानिकांनी सांगितले. गव्याने हल्ला केल्याचा प्रत्यक्षदर्शी उपस्थित असल्याने शेवटी गव्याच्या हल्ल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दिनेश गावडे याची शवचिकित्सा करण्यात आली होती, त्यावेळेला फोरेन्सिक विभागाच्या डॉक्टरांनी शवचिकित्सा अहवालात दिनेशचा मृत्यू हा गव्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचे नमूद केले. पण या अहवालात त्रुटी असल्याचे दाखवत वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी या अहवालालाच आक्षेप घेतला होता, त्यात खुद्द गव्याने हल्ला केला की घातपात असा संशय निर्माण केल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
दीड वर्षांपूर्वी वन खात्याकडे झाडांची तोड अवैधरीत्या चालल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र दीड वर्ष उलटले तरी वन खात्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही की पत्राला उत्तर देण्यात आले नाही. वारेमाप जंगलतोड होत आहे, आणि वन खाते गप्प आहे.
राने वनांतील झाडांची तोड करून प्लॉट तयार करून विकले जात आहेत. सखल भागात मातीचा भराव टाकून जमिनी भरून काढल्या जात आहेत, ओहोळ बुजवले जात आहेत, त्यामुळे वन्य प्राण्यांच्या वाट बंद झाल्या आहेत, पाणी मिळणे मुश्कील ठरले आहे, याला वन खाते आणि स्थानिक पंचायतच जबाबदार आहे.
बेतोड्यातील राने वने नष्ट होत चालली आहेत, त्यामुळेच वन्य प्राणी लोकवस्तीत येऊ लागले आहेत. वारेमाप झाडांची तोड चालली असली तरी वन खाते आणि पंचायतीसह इतर संबंधितांचे त्याकडे लक्षच नाही, उलट कानाडोळा केला जात आहे. हे कुठे तरी थांबायला हवे.
वास्तविक वन खात्याने शवचिकित्सा अहवालाला आक्षेप घेतल्यामुळे त्यांच्याकडून तपासणीसाठी तज्ज्ञ माणूस पाठवणे आवश्यक होते, पण वन खात्याचा एक अधिकारी सोडल्यास कुणीही तज्ज्ञ आला नाही. पाठवलेल्या माणसाला काहीच माहिती नाही. शेवटी प्रत्यक्ष पाहणी आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून गव्यानेच हल्ला केल्याचे स्पष्ट झाल्याचे डॉ.मधू घोडकिरेकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.