
वाळपई: दोडामार्ग तालुक्यातील विर्डी या सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेल्या धबधब्यांवर सुरक्षिततेच्या कारणास्तव जून ते सप्टेंबरपर्यंत प्रवेशबंदी लागू केली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सर्वांच्या संमतीने हा ठराव मंजूर करत अधिकृत पत्रकाद्वारे ही बंदी लागू केली आहे.
गावातील अंतर्गत भागांतील धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. परंतु, याच धबधब्यांवर गेलेल्या अनेक पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्याने जीव गमवावे लागले आहेत. याआधीही काही गंभीर दुर्घटना घडल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण होते.
यावर्षी मान्सून वेळेआधीच सक्रिय झाल्याने विर्डीतील सर्व धबधबे सध्या पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याआधीच स्थानिकांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेत, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे.
पर्यटकांनी नियमांचे पालन करावे!
विर्डी पंचायतीने पत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे, की पावसाळ्यात गावातील कोणत्याही धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना परवानगी दिली जाणार नाही. या निर्णयाचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. विर्डी ग्रामस्थांचा हा निर्णय सुरक्षितता आणि भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी अत्यंत योग्य आहे. पर्यटकांनी नियमांचे पालन करावे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मद्यपी पर्यटकांचा स्थानिकांना त्रास
ग्रामस्थांच्या मते, अनेक पर्यटक मद्यधुंद अवस्थेत धबधब्याकडे जातात. अशा वेळी त्यांना मार्गदर्शन करताना किंवा रोखण्याचा प्रयत्न केल्यास ते उद्धटपणाने वागतात. स्थानिकांना धमकावतात आणि गावातील शांततेला धोका निर्माण करतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातीलही पर्यटकांचा यात सहभाग असतो. अपघात टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.