Sattari News : सत्तरीत भाजीपाला लागवडीवर भर; स्वयंरोजगाराकडे ‘पाऊल’

पहिल्या टप्प्यातील बियाण्यांची विक्री सुरू
Planting vegetables
Planting vegetablesDainik Gomantak

सपना सामंत

भाजीपाला लागवड हे एक स्वयंरोजगाराचे साधन असून भाजीपाला हा मनुष्याला दैनंदिन आहारात लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कमी दिवसांत जास्त नफा देणारे पीक म्हणजे भाजीपाला होय. योग्य नियोजन करून भाजीपाला लागवड आणि काढणी केल्यास यातून शेतकरी बांधवांना नफा मिळतो. त्यामुळे आता सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजी पीक घेण्याच्या मार्गावर आहेत.

बाजारात मिळणारी भाजी ही रासायनिक खतांचा वापर करून उगवली जाते. त्यामुळे हे हानिकारक रसायन आपल्या शरीरात जाऊन अनेक आजार होत आहेत. याबाबत आता समाजात जनजागृती पसरत असून पूर्वीसारखी भाजी लागवड करण्याच्या उद्देशाने आजची पिढी हळूहळू कृषी क्षेत्राकडे वळताना दिसत आहे.

मे महिन्यातच जर भाजी लागवडीसाठी जमीन तयार करून त्याची योग्य मशागत केली तर भाजीचे उत्पन्न चांगल्या प्रकारे घेता येते. त्यामुळे सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी बियाणे तयार ठेवते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाळपई कृषी खात्याच्या कार्यालयातून पहिल्या टप्प्यातील बियांची विक्री सुरू झाली आहे. त्यात एकूण 80 किलो बियाणे शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच टप्प्याटप्प्याने बियांची निर्यात वाढविली आहे व मागणीनुसार कृषी खाते शेतकऱ्यांसाठी बिया उपलब्ध करून देत आहे, असे वाळपई विभागीय कृषी कार्यालयाचे कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले.

Planting vegetables
Canacona News : सामाजिक जागृतीसाठी नाट्यकला प्रभावी माध्‍यम : राजू नायक

यंदा सत्तरीत सुमारे 15 हेक्टर जमिनीत भाजीची लागवड करण्यात येणार आहे. मागच्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. सत्तरीतील वेगवेगळ्या भागांत आता भाजी लागवड करण्यास सुरवात केली आहे. काहींनी बियाण्यांची पेरणी करून रोपेही उगवली आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांची भाजी तयार होणार आहे.

पावसाळी भाज्यांना मागणी

पावसाळी भाज्यांना मोठी मागणी असते. या भाज्या हंगामी असल्याने आरोग्यासाठीही चांगल्या मानल्या जातात. भाजीपाल्याची मे-जूनमध्ये लागवड केली की जुलै आणि ऑगस्टच्या हंगामापर्यंत तयार होतो. या भाज्यांना बाजारात चांगला दर मिळते. जुलै ते सप्टेंबर हे तीन महिने भाजी लागवडीसाठी सुपीक वातावरण असते.

बियाण्यावर 50 टक्के सवलत

गोव्याबरोबरच सत्तरीत बेळगावातून भाजी पुरवली जाते. तसेच त्यांचा दर महाग असल्यामुळे सामान्यांना फटका बसतो. सत्तरीत पालेभाजी लागवड केल्याने स्थानिकांना ताजी भाजी उपलब्ध होणार आहे. सध्या कृषी खात्यातर्फे बियाण्यांवर 50 टक्के सवलत असून कृषी खात्याच्या वाळपई कृषी अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांकडून योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन मिळते.

Planting vegetables
Dabolim Airport: गोव्यातील दाबोळी विमानतळ झाले अत्याअधुनिक, अशी सुविधा वापरणारे आशिया खंडातील ठरले पहिलेच विमानतळ

कृषी खात्यात उपलब्ध असलेली भाजी बियाणी

कोथिंबीर, भोपळा, दोडगी (रेखा), दोडगी (गरिमा), वाल, चिबूड, कोहाळा, कारली (कथय), कारली (मिडोरी लांब), भेंडी (जेके ६२), भेंडी (राधिका), कोकणदुधी (वधन), मिरची (सितारा), चिटकी (पीएनबी), काकडी (राधिका), तांबडी भाजी, मुळा, नवलकोल, काळींग व वांगी.

भेंडी, वाल पापडीची लागवड

चरावणे सत्तरी येथील शेतकरी दशरथ गावस यांच्या शेतीबागायतीत भेंडी व वाल पापडी यांची लागवड करण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी ही लागवड केलेली आहे. त्यामुळे आता भेंडीची रोपे चांगल्या पद्धतीने वर येत आहेत. जुलैपर्यंत ही भाजी तयार होईल.

"यंदा सुरुवातीच्या टप्प्यातील बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे व विक्री सुरू आहे. बियाण्यांच्या दरात ५० टक्के सवलत दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ती फायद्याची आहे. दिंवसेंदिवस बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाण्यांची आयात केली जाणार आहे.'

विश्वनाथ गावस, कृषी अधिकारी, वाळपई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com