गोवा दौरा अर्धवट सोडून गुंडू रावांची बंगळुरकडे धाव

तीन दिवसांच्या गोवा (Goa) दौऱ्यावर आलेले काँग्रेस (Congress) प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी आपला बेत अचानक बदलला
काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव
काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव Dainik Gomantak

मडगाव : तीन दिवसांच्या गोवा (Goa) दौऱ्यावर आलेले काँग्रेस (Congress) प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी आपला बेत अचानक बदलून आज रात्रीच पुन्हा बंगळुरूला जाणे पसंत केले. त्यांच्या घरी काही अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी आपला गोवा दौरा आटोपता घेतल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. (Dinesh Gundu Rao left Goa tour halfway and left for Bangalore)

गोव्यात काँग्रेसच्या नेतृत्वात बदल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षाशी युती या मुद्द्यावर सध्या काँग्रेस वर्तुळात चर्चा चालू असताना राव यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला गेला होता. आज गुरुवारी ते सांगे, कुडचडे आणि केपे तर शुक्रवारी काणकोण, वेळ्ळी व कुंकळ्ळीच्या गट समित्यांना भेटणार होते. राव यांच्या या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पुन्हा एकदा नेतृत्वबदलाच्या मुद्द्याने उचल खाल्ली होती. गोव्यातील काँग्रेस पक्षात रचनात्मक बदल झालेच पाहिजेत अन्यथा गोव्यात काँग्रेस आणखीनच रसातळाला जाईल, असे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी उघडपणे म्हटले होते.

काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव
Goa: काँग्रेस पक्ष गोव्यातील प्रत्येक प्रश्नावर आक्रमक

या पार्श्वभूमीवर आज राव यांनी मडगावात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो तसेच माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्याच दरम्यान त्यांना फोन आला आणि त्यांनी आपण दौरा सोडून परत जात असल्याचे सांगितले.

लॉरेन्स यांचा रोष

दिनेश राव यांच्या या नियोजित दौऱ्याच्या एक दिवस आधी कुडतरीचे आमदार लॉरेन्स यांनी एका फेसबुक वाहिनीला मुलाखत देताना गोव्यात नेतृत्व बदल केले नाही तर काँग्रेस आणखी खाईत जाणार असे म्हटले होते. गोव्यात 17 आमदारांवरून काँग्रेसची आमदारांची संख्या ५ वर येण्यास गोव्यातील हेच कमकुवत नेतृत्व कारणीभूत होते, असा आरोप करून त्यांनी गिरीश चोडणकर यांच्या विरुद्धचा रोष जाहीर केला होता.

काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव
Goa Bhumiputra Bill: जनभावनेपुढे नमले सरकार; भूमिपुत्र विधेयक मागे

2017 मध्ये गोव्यात काँग्रेसचा जनाधार 70 टक्के होता. पण 10 आमदारांनी पक्ष सोडल्यावर तो 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. आणि या सर्व अधःपतनाला हे कमकुवत नेतृत्वच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोव्यातील काँग्रेस नेतृत्वाबाबात केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट भूमिका घ्यावी. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी दोनवेळा पदाचा राजीनामा दिला आहे. एक तर तो स्वीकारावा किंवा नाकारावा. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हा निर्णय योग्य वेळी होणे पक्षासाठी हितावह आहे.

-आलेक्स सिक्वेरा, काँग्रेस नेते तथा माजी मंत्री

चर्चा नेतृत्वबदलावर नव्हती : कामत

निवडणुकीच्या वेळी पक्षाचा प्रचार कसा असावा आणि धोरणे कशी असावी यासाठी काही मीडिया स्टेटरजिस्टबरोबर ही चर्चा होती. सुमारे 10 जणांनी आपले प्रेझेंटेशन यावेळी दाखविले ते पाहायला आम्ही एकत्र जमलो होतो. गोव्यात नेतृत्वबदल करण्यासंदर्भात किंवा युती करण्याच्या बाबतीत काही चर्चा झाली का असे विचारले असता, अशी काहीच चर्चा झाली नाही असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com