

बार्देश: धारगळ ग्रामपंचायत क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक, व्यावसायिक, विविध आस्थापने तसेच सरकारी कार्यालयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सततच्या वीज खंडित होत असल्यामुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले असून स्थानिकांत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, परिसरातील काही ठिकाणी पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटल्या आहेत. तसेच काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असून लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असले तरी वातावरणात उकाडा आणि दमटपणा कायम आहे. अशा स्थिती पंखे, एसी, पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटारी तसेच इतर विद्युत उपकरणे बंद पडत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक फटका बसत आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांना झोप न लागण्याची समस्या निर्माण झाली आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे परिसरातील दुकाने, हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना तसेच लघुउद्योगांचे कामकाज प्रभावित झाले आहे. संगणकाधारित व्यवहार, ऑनलाइन सेवा, बँकिंग संबंधित कामे आणि इंटरनेट सुविधा विस्कळीत होत असल्याने आर्थिक नुकसानही होत असल्याची तक्रार व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
याशिवाय सरकारी कार्यालयांमधील कामकाजावरही परिणाम झाला असून नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि इतर शासकीय सेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
तसेच भविष्यात पावसाळ्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी वीजवाहिन्यांची नियमित तपासणी, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.