
Goa History: गोवा म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं छोटसं पण निसर्ग सौंदर्यानं नटलेलं राज्य आठवतं, जे निळाशार समुद्रकिनारे आणि नाईटलाईफ प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहितीये का? गोव्याचा भूगोल जेवढा समृद्ध करणारा आहे तेवढाच त्याचा इतिहासही आपल्या बरचं काही शिकवून जातो.
पोर्तुगीजांच्या जोखडात कैद असलेल्या गोव्याला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मी तुम्हाला गोव्याचा इतिहास आणि त्याच्या कहाणीबद्दल आता का सांगत आहे? होय, मित्रांनो त्याचं प्रयोजनही तसचं काहीसं आहे, गोव्याच्या मुक्तीसाठी एका डाकूनं चक्क त्यावेळच्या भारत सरकारला पत्र लिहिलं होतं. ऐकून चकित झालात ना... चला तर मग वेळ न दौडता हा नेमका किस्सा आहे ते जाणून घेऊया...
तत्पूर्वी, आपण या लेखाच्या माध्यमातून या डाकूबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. गोव्याच्या मुक्तीसाठी भारत सरकारला पत्र लिहिणारा हा डाकू दुसरा तिसरा कोणी नसून 'मानसिंह' होता. मध्य प्रदेशातील भिंडमधील डाकू मान सिंहची कहाणी खूप वेगळी आणि अनोखी आहे. एका सामान्य आणि प्रतिष्ठित कुटुंबातील माणूस कसा 'डाकू' बनला आणि त्याची कहाणी जगातील प्रतिष्ठित मासिकांमध्ये का छापून आली, हे जाणून घेणे खूप रंजक आहे.
1950 च्या दशकात भिंडमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. रामपुर नावाच्या एका गावात तर शेतातील सर्व पीक पूर्णपणे सुकून गेली होती. अशातच, अचानक एक दिवस आठ बैलगाड्या गहू घेऊन गावात पोहोचल्या. गाडीवानाने 'मान सिंह यांच्या वतीने' दिलेला संदेश ऐकून गावकऱ्यांचे डोळे पाणावले. सरकार ज्याला पकडण्यासाठी 15,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, तोच मान सिंह गरिबांना मदत करत होता.
मान सिंह यांचा जन्म 1890 मध्ये आग्राजवळच्या राठौर खेडा गावात एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील बिहारी सिंह गावाचे प्रमुख होते. मान सिंह वयाच्या 24व्या वर्षीच गावाचे प्रमुख आणि आग्रा जिल्हा मंडळाचे सदस्य म्हणून निवडले गेले होते. त्यांचा मोठा भाऊ नवाब सिंह यांच्यासोबतच मान सिंह आणि त्यांच्या वडिलांचा त्यांच्या जमिनीवरुन तल्फी राम नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला. काही दिवसांनी गावात एका सावकाराच्या घरी दरोडा पडला. तल्फी रामने पोलिसांना खोटी माहिती दिली की, नवाब सिंहनेच हा दरोडा टाकला आणि मान सिंहने त्यात मदत केली.
या अपमानामुळे मान सिंह आणि त्यांचे वडील संतप्त झाले. त्यांनी तल्फी रामला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या चार मुलांसह आपल्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी चंबळच्या जंगलात गेले. एका रात्री मान सिंह यांनी आपल्या साथीदारांसह तल्फी रामच्या घरावर हल्ला केला. तल्फी राम वाचला, पण त्याचे अनेक साथीदार मारले गेले. पोलिसांनी मान सिंह यांना अटक केली.
या घटनेनंतर तल्फी रामने पोलिसांच्या मदतीने मान सिंह यांच्या कुटुंबावर पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात मान सिंह यांचा सर्वात मोठा मुलगा जसवंत सिंह आणि पुतण्या दर्शन सिंह यांचा मृत्यू झाला. या घटनेने मान सिंह खूप संतप्त झाले.
1938 मध्ये चांगल्या वर्तनामुळे मान सिंह यांची तुरुंगातून सुटका झाली. 4 जुलै 1940 च्या रात्री त्यांनी आपल्या तीन मुलांसह तल्फी रामच्या घरावर हल्ला करुन त्याच्या कुटुंबातील दोन महिला वगळता सर्वांना ठार केले. यानंतरच मान सिंह यांनी पूर्णपणे दरोडेखोरीचा मार्ग अवलंबला.
मान सिंहबद्दल असे म्हटले जाते की, ते दारु पीत नव्हते आणि पूर्णपणे शाकाहारी होते. ते एक धार्मिक व्यक्ती होते, पहाटे नदीत अंघोळ करुन काली मंदिरात पूजा करायचे. त्यांनी अनेक मंदिरे बांधली होती आणि त्यासाठी लागणारा पैसा श्रीमंत जमीनदारांना लुटून मिळवला होता. काही मंदिरांमध्ये त्यांनी आपल्या नावाच्या पितळी घंटाही लावल्या होत्या. बटेश्वरनाथ मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते नेहमी सामील व्हायचे.
मात्र, आपल्या शेवटच्या काळात मान सिंह यांना शांतता आणि घराची ओढ लागली. त्यांनी भारत सरकारला एक पत्र लिहून सांगितले की, ते स्वखुशीने डाकू किंवा खुनी बनले नाहीत. नशिबाने आणि परिस्थितीने त्यांना असे बनण्यास भाग पाडले. 'एक सच्चा भारतीय असल्याने मला गोवा मुक्त करायचा आहे. मला पोर्तुगीजांना हाकलून द्यायचे आहे,' असेही त्यांनी त्या पत्रात लिहिले होते. मात्र, भारत सरकारने त्यांच्या या पत्राला कोणतेही उत्तर दिले नाही, ज्यामुळे मान सिंह खूप निराश झाले.
मान सिंह यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, चार राज्यांतील 1700 पोलिसांनी 15 वर्षे 8000 चौरस मैलांच्या परिसरात त्यांचा पाठलाग केला. या काळात पोलिसांशी त्यांच्या सुमारे 80 वेळा चकमकी झाल्या, पण प्रत्येक वेळी पोलिसांना (Police) अपयश आले. त्यांना पकडण्यासाठी सरकारने त्या काळात दीड कोटी रुपये खर्च केले होते. नोव्हेंबर 1954 मध्ये मध्य भारताचे तत्कालीन गृहमंत्री नरसिंहराव दीक्षित यांनी मान सिंह यांना एका वर्षाच्या आत पकडले नाही, तर आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊ, अशी घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी गोरखा जवानांची एक विशेष कंपनी तयार केली. मात्र अखेर या गोरखा जवानांच्या चकमकीत मान सिंह यांचा अंत झाला.
गोव्याला (Goa) पोर्तुगिजांच्या जुलुमशाहीतून मुक्त करण्यासाठी भारत सरकारला पत्र लिहिणाऱ्या मान सिंह यांचे जीवन एखाद्या चित्रपटाच्या कहाणीसारखे होते, ज्यात अन्याय, बदला, धर्म आणि लोकांप्रतीची सहानुभूती असे सर्व पैलू होते. अखेर त्यांचा अंत झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.