काँग्रेसने आजवर फक्त जातिभेद व धर्मभेदाचे राजकारण केले. त्याउलट भाजपा विकासकामांच्या मुद्यावर लोकांकडे मत मागत आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापना करेल आणि काँग्रेस पुढील ४० वर्षे सत्तेवर येऊ शकणार नाही, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.
‘अब की बार 400 पार’चा नारा देत, भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवोली मतदारसंघातील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, ही लोकसभा निवडणूक देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आहे. त्यामुळे कुठल्याही स्थितीत 2019 मध्ये ज्याप्रकारे शिवोलीतून भाजपाला आघाडी मिळाली होती, तशीच कामगिरी यंदाही करायची आहे.
या बैठकीस शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो गैरहजर दिसल्या. याविषयी माध्यमांना स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आमदार दिलायला या गोव्यात नसल्याने त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
आघाडीचे श्रेय हे कुणा एका ठरावीक व्यक्तीला मिळणार नसून सर्व जुन्या तसेच नवीन कार्यकर्त्यांना मतांच्या आघाडीचे एकसमान श्रेय जाईल. त्यामुळे कुणीही मनात वेगळा विचार आणू नये, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवोलीमधील भाजपा कार्यकर्त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.
हळदोणेचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, श्रीपाद भाऊंच्या कारकिर्दीत आयुष इस्पितळ, दोनापावलामधील वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट तसेच दोन जिल्हा इस्पितळांचे सुरू असलेले काम तसेच सर्वत्र ‘वेलनेस’ हे भाऊंच्या कार्यकाळात आले.
जर या गोष्टी कार्लुस यांना दिसत नसल्यास त्यांनी एकदा आयुष इस्पितळात जाऊन यावे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी हळदोणेचे आमदारांचा समाचार घेतला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.