

पणजी: सर्व धर्मांचे विविध ग्रंथ त्या-त्या धर्मांसाठी महत्त्वाचे आहेत. परंतु देशासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी संविधान हाच सर्वोच्च ग्रंथ आहे. हे संविधान बदलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तो हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने देशभर ‘संविधान बचाव अभियान'' छेडले आहे, ते आता घरोघरी नेण्यात येईल, असे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
काँग्रेसच्या वतीने आझाद मैदानावर मंगळवारी सायंकाळी ‘संविधान बचाव अभियान''ची सुरुवात झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ठाकरे बोलत होते. यावेळी प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा खलप, खासदार विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, उपाध्यक्ष एम. के. शेख, प्रवक्ते विजय भिके, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर धर्म विचारून मारल्याचा भाजपने बोभाटा सुरू केला आहे, त्याआडून हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न एक शक्ती करीत आहे. देशातील सर्व धर्माच्या लोकांना समान हक्क दिले गेले आहेत. देश तुटलेला नाही, पण महात्मा गांधी व नेहरूंचे बंधुत्वाचे विचार पुढे नेणे आवश्यक आहे. याप्रसंगी युरी आलेमाव, खासदार विरियातो, एल्टन डिकॉस्ता, प्रतीक्षा खलप, गिरीश चोडणकर यांनी आपली मते मांडली. मीडिया सेलचे अमरनाथ पणजीकर यांनी सूत्रसंचालन केले आणि वीरेंद्र शिरोडकर यांनी आभार मानले.
प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी पहलगाम हल्ल्यानंतर म्हापसा येथील कार्यक्रमात लोकांना हातात तलवारी घेण्याचे आवाहन करणाऱ्या बजरंग दल प्रमुखांवर राज्य सरकारने कारवाई करावी आणि मगच पुढची आश्वासने द्यावीत, असा सल्ला दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.