

म्हापसा: गेल्या काही महिन्यांपासून येणाऱ्या कथित अवाजवी आणि अनियमित वीज बिलांमुळे संतप्त झालेल्या बार्देश तालुक्यातील कोलवाळ ग्रामस्थांनी आज सोमवारी, म्हापसा येथील वीज खात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सरपंच रितेश वारखंडकर आणि माजी सरपंच नितीन कांदोळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिला व नागरिकांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन जाब विचारला.
गणेशोत्सवाच्या तोंडावर भरमसाठ आलेल्या वीज बिलांमुळे सर्वसामान्य संकटात सापडलेत. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांत वीज बिले अचानक दुप्पट ते तिप्पट झाली आहेत. पूर्वी ज्या घरांचे बिल ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत यायची, त्यांना आता थेट ४ हजार, ६ हजार, ८ हजार ते तब्बल १७ हजार रुपयांपर्यंतची बिले पाठवली आहेत.
दोन खोल्यांच्या घरात राहणाऱ्या आणि अवघे १० हजार रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या गरीब कुटुंबांवर, तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांवर या वाढीव बिलांमुळे मोठा आर्थिक भारपडत आहे. खात्याकडून दरमहा बिल न देता ४५ ते ६० दिवसांनी किंवा २ ते ३ महिन्यांनी एकत्र बिल दिले जात आहे.
त्यामुळे युनिटचा वापर वाढून ग्राहकांना उच्च वीज दर आकारणी आणि दंडात्मक शुल्काचा फटका बसत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, बिले देण्यास तात्पुरता विलंब झाल्याचे त्यांनी मान्य केले असून, लवकरच दर महिन्याला नियमित बिलिंग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.