
पणजी: कोळसा कराबाबत आपण विचारलेला तारांकित प्रश्न अतारांकित करून सरकारने त्याचे उत्तर दिले आहे. अदानी, जिंदाल यांसारख्या कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी तब्बल तीन ते चार हजार कोटींचा घोटाळा केला आहे.
पण, केवळ या कंपन्यांच्या प्रेमापोटी सरकारला उत्तर द्यायचे नाही, असा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सभागृहात केला. दरम्यान, युरींचा विषय २८ जुलैला असल्याने त्या दिवशी त्यावर चर्चा होईल, असे सभापती रमेश तवडकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरवात होण्याआधीच युरींनी कोळसा कराबाबत विचारलेला प्रश्न ऐरणीवर आणला. आपण हा प्रश्न तारांकित म्हणून विचारला होता, पण सरकारने तो अतारांकित करून त्याचे उत्तर सोमवारीच आपल्याला दिले. अदानी, जिंदाल यांसारख्या कंपन्यांनी तीन ते चार हजार कोटींचा घोटाळा केलेला आहे. लोकांच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असल्याने त्यावर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र सरकार कोळशात बुडत चालले आहे.
दरम्यान, युरींचा प्रश्न केवळ पुढे ढकलण्यात आला आहे. त्यावर २८ जुलै रोजी चर्चा होणार असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सभागृहाला दिल्यानंतर ‘२८ जुलैलाच तुम्ही यावर बोला’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी युरींना रोखण्याचा प्रयत्न केला.
विरोधी आमदारांच्या प्रश्नांना सरकारला उत्तरे द्यावयाची नाहीत. त्यामुळेच आमचे प्रश्न वारंवार पुढे ढकलले जात आहेत, किंबहुना ते अतारांकित करून उत्तरे दिली जात आहेत. असे निर्णय घेऊन भाजप सरकार लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. त्यावर बोलताना, मुख्यमंत्री सावंत म्हणाले, लोकशाहीची हत्या आम्ही नाही तर काँग्रेस सरकारनेच केली आहे. देशावर आणीबाणी लादली, त्याचवेळी लोकशाहीची हत्या झाल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.