
CM Pramod Sawant Calls for Revision of Goa’s History on Portuguese Rule
फोंडा: पोर्तुगीज आणि गोमंतक यासंबंधीचा चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकविला जात असून पोर्तुगिजांनी संपूर्ण गोव्यावर नव्हे, तर केवळ तीनच तालुक्यांवर राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांवर आक्रमण करून त्यांना रोखून धरले म्हणून बहुतांश गोमंतकीय धर्मांतरापासून बचावले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
फर्मागुढी येथे शिवजयंती सोहळ्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोपाळ गणपती मंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या मंडपात बोलत होते. हा कार्यक्रम राज्य सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने आयोजिला होता.
यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, फोंड्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, वेलिंगच्या सरपंच दीक्षा सतरकर आदी उपस्थित होते.
डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पोर्तुगिजांनी साडेचारशे वर्षे गोव्यावर राज्य केल्याचा चुकीचा इतिहास शिकविला जात असून तो बदलायला हवा. पोर्तुगिजांनी प्रारंभी सासष्टी, बार्देश आणि तिसवाडी हे तीन तालुके बळकावले. नंतर फोंडा, केपे आणि काणकोण अशा तीन तालुक्यांत सत्ता स्थापन केली. पण पोर्तुगिजांनी संपूर्ण गोवा (Goa) काबीज केल्याची चुकीची माहिती इतिहासाच्या पानांवर लिहिली गेली. पोर्तुगिजांनी तेथील मंदिरे पाडली. त्यामुळे गोमंतकीयांना आपले देव सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. आजच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, त्यांची विचारसरणी याविषयी माहिती द्यायला हवी.
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात केले. शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने जपण्याची गरज आहे. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, ज्या शिवबांना जिजाऊ मातेने घडविले, त्यांचे स्मरण करताना स्वराज्यासाठी त्याग केलेल्या महाराणी येसूबाई यांचेही स्मरण तेवढेच महत्त्वाचे आहे. सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी केले. स्वागत दीपक बांदेकर यांनी तर नरेंद्र तारी यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात ढोल-ताशा पथक तसेच बालभवनच्या मुलांनी सुरेख पेशकश केली.
बार्देश तालुक्यात पोर्तुगिजांनी पाय ठेवला आणि हिंदूंच्या धर्मांतरणासाठी प्रयत्न सुरू केले. तसा आदेश काढल्याचे कळताच शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांवर (Portuguese) स्वारी केली आणि त्यांना मागे रेटले. त्यामुळेच धर्मांतरण रोखले गेले. शिवाजी महाराजांचा एक जरी गुण प्रत्येकाने आत्मसात केला तर स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.