

पणजी: कदंब पठारावरील चिंबल गावच्या हद्दीतील प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्प खरोखरच पर्यावरणाला हानी पोहोचवणारा असेल तर तो रद्द करू. त्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करेन, असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी चिंबल ग्रामस्थांना दिले.
युनिटी मॉल व प्रशासन स्तंभाविरोधात २९ दिवसांपासून चिंबलच्या लोकांचे साखळी उपोषण सुरू आहे. एका बाजूला सरकारने या प्रकल्पाबाबत तोयार तलावाच्या बाजूने लोकांच्या मागणीनुसार सर्वेक्षण सुरू केले आहे. आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी रात्री जाहीर केल्याप्रमाणे उपोषणकर्ते सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची जुने गोवा येथे त्यांच्या घरी भेट घेण्यास गेले होते.
दुपारपर्यंत चिंबल ग्रामस्थ न आल्याने श्रीपाद नाईक यांनी आपले निश्चित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली. तोपर्यंत चिंबलच्या ग्रामस्थांनी श्रीपाद नाईक यांच्या निवासाबाहेर ठिय्या मांडला आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांना घरासमोर बॅरिगेट्स लावून आलेल्या लोकांना थोपवून धरावे लागले.
सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांनी चिंबलच्या ग्रामस्थांची भेट घेतली. त्यावेळी आंदोलनाविषयी गोविंद शिरोडकर यांनी आंदोलनाची सर्व पार्श्वभूमी नाईक यांच्यासमोर कथन केली. त्यावर त्यांनी सांगितले की, आपण यापूर्वीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या प्रकल्पाविषयी सक्ती नको, असे सांगितले आहे.
चिंबलच्या ग्रामस्थांनी मांडलेल्या पर्यावरणीय हानीच्या दाव्यांबाबत सरकार गंभीर आहे. जनतेच्या मागण्यांबाबत सरकार संवेदनशील असल्यामुळेच राज्य सरकारने सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. जर युनिटी मॉल प्रकल्पामुळे खरोखरच पर्यावरणाला हानी पोहोचणार असल्याचे सिद्ध झाले तर सरकार हा प्रकल्प रद्द करेल आणि आपण जनतेच्या पाठीशी उभे राहू, असे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.