
साखळी: केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाणी बंद पडल्यानंतर संबंधित भागांचे पुनर्वसन करून या भागातील लोकांना विविध मार्गातून स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी संपूर्ण देशभरात १० हजार कोटींची तरतूद केली आहे.
त्या अनुषंगाने गोव्यातील खाण क्षेत्रातील लोकांना शेती बागायती तसेच मत्स्यपालन यासारख्या व्यवसायात आणून स्वावलंबी करण्याचा आमचा विचार आहे. त्याच दृष्टिकोनातून गोव्यातील खाण भागाला भेटी दिल्याचे केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.
साखळी मतदारसंघातील विर्डी गावात सेसा कंपनीच्या असलेल्या नक्षत्र उद्यान, बांबू हाऊस, पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्प या प्रकल्पांना खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी भेट दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनी सेसा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारलेल्या विविध प्रश्नांमुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. खाण क्षेत्रातील लोकांना विशेषतः स्थानिक लोकांना कंपनीने आत्तापर्यंत किती रोजगार दिला? कंपनी खाण प्रक्रिया करत असलेल्या जमिनीवर कोणाची मालकी आहे? तसेच पर्यावरण व इतर संबंधीत कंपनीकडून कोणती पावले उचलण्यात आली? असे विविध प्रश्न या अधिकाऱ्यांनी सेसा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले.
या प्रश्नांवर गोंधळलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव करताना जेमतेम उत्तरे दिली. या भेटीत सेसा कंपनीतर्फे निर्माण करण्यात आलेल्या विविध प्रकल्पाविषयी खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनीही माहिती जाणून घेतली व त्यांनीही कंपनी अधिकाऱ्यांची झडती घेतली.
यावेळी रेड्डी यांच्यासमवेत राज्यसभा खासदार सदानंद शेट तनावडे यांची उपस्थिती होती. विर्डी येथील भेटीवेळी साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, अंजना कामत, दीपा जल्मी यांची उपस्थिती होती, तर सुर्ल येथे भेटीच्या वेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, सुर्लच्या सरपंच सहिमा गावडे, उपसरपंच सुभाष फोंडेकर व इतर पंच सदस्य तसेच जलस्रोत खात्याचे कनिष्ठ अभियंता विनोद भंडारी, नरेश पोकळे व इतरांची उपस्थिती होती.
सुर्लमधील पाणी प्रकल्पाची स्तुती
केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सुर्ल गावात जलस्रोत खात्यातर्फे हल्लीच साकारण्यात आलेल्या खाण खंदकातील पाण्याचा शेतीसाठी उपयोग करून देणाऱ्या प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पाबाबत जलस्रोत खात्याचे प्रधान अभियंता प्रमोद बदामी यांनी सविस्तर माहिती दिली. खाण खंदकातून पाणी खालील एका खंदकात आणून ते स्वयंचलित यंत्रणेद्वारे थेट बागायतदारांच्या बागायतीमध्ये स्प्रिंकलद्वारे शिंपडण्याची ही योजना उत्कृष्ट असल्याचे ते म्हणाले.
सुर्लसारखा प्रकल्प देशात इतरत्र साकारणार
मंत्री रेड्डी या योजनेची स्तुती करत गोव्यात साकारण्यात आलेला हा प्रकल्प देशातील पहिला व अभिनव असा पायलट प्रकल्प आहे. अत्यंत उत्कृष्ट असा प्रकल्प असून याचप्रकारे देशातील इतर भागांमध्येही असे प्रकल्प साकारण्यासाठी केंद्र सरकार विचार करणार, असे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.