
बार्देश: विधानसभेतल्या सदस्यांना, विशेषत: ज्यांनी आपला पक्ष बदलला आहे, त्यांनी गोव्यातील कोळसा वाहतूक आणि दुहेरी मार्गिका (डबल ट्रॅकिंग) यावरील आपली भूमिका का बदलली, याचे जनतेला स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी हळदोण्याचे काँग्रेस आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली. तसेच गोव्याचे भवितव्य राजकारणासाठी विकू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
‘संकल्प आमोणकर हे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे. मुरगावच्या क्रॉसजवळ जाऊन त्यावर हात फिरवायचे आणि क्रॉसवर जमा झालेला कोळसा हाताला लागल्यावर हात सर्वांना दाखवायचे. तुम्ही पक्ष बदलला आहे, पण स्थिती बदललेली नाही. तुम्हाला लोकांसमोर हे स्पष्ट करावे लागेल की तुमची भूमिका कशी बदलली, असे ते म्हणतात.
‘माझी फक्त एकच विनंती आहे – आपण गोव्याचा विचार करायला हवा, राजकारणाचा नाही. हे राजकारणाबद्दल नाही. हा तुमचा आणि माझा प्रश्न आहे. राजकारणात आपण उद्या नसूही शकतो, पण पर्यावरणावर आणि माणसांचे होणारे हे नुकसान कायमचे राहणार आहे, त्याचे दूरगामी दुष्परिणाम होतील. लोकांच्या जिवाशी खेळू नका, हे घडू देऊ नका, अन्यथा तुम्हाला इतिहासात तुमचे नाव ‘गोव्याचा विनाश करणारे’ म्हणून लिहिले जाईल, असे ॲड. फेरेरा म्हणाले.
गोमंतकीयांनी ‘त्या’ आमदारांचे जुने व्हिडिओ पुन्हा बघावेत, जे २०२२ मध्ये कोळसा विषयावर वेगळीच भूमिका मांडत होते. फक्त २०२२ मध्ये झालेल्या कोळसा विषयावरील चर्चेचे व्हिडिओ पुन्हा लावा. त्या वेळी त्यांनी व्यक्त केलेली खरी काळजी आता कुठे गेली, हे त्यांना विचारा. कारण प्रत्येकजण आपले विधान बदलतोय. निवडणुकीपूर्वी एक खेळ, निवडणुकीनंतर दुसरा खेळ आणि आता पक्षबदल हा तिसरा खेळ, असे ॲड. फेरेरा म्हणतात.
कोळसा असो किंवा प्रवासी, दुहेरी मार्गिकेचे कारण देणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या खोट्याला पूर्णविराम दिला, असे फेरेरा म्हणतात. पर्यटनाच्या मुद्यावर ॲड. फेरेरा म्हणतात, की एकाच मार्गिकेवर कोळसा आणि पर्यटक वाहून नेणे शक्यच नाही. ‘पर्यटकांना गोव्यातून कर्नाटकात नेता की तिथून आणता? काळे-गोरे करायला? आपल्या कडे कोळसा वाहतुकीसाठी योग्य तंत्रज्ञान नाही, आणि सगळीकडे कोळसा सांडतो. तो इतका सुक्ष्म कणात बदलतो की, लोकांना श्वसनाचे आजार होतात आणि मार्गावरचे लोक आजारी पडतात, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
रेल्वे मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर स्पष्ट नमूद केले आहे की, दुहेरी मार्गिकेचा पहिला उद्देश कोळसा वाहतूक आहे आणि पर्यटन नंतर येते. जेव्हा मंत्रालयाच्या वेबसाइटवरच कोळसा हा प्राथमिक उद्देश असल्याचे आहे, तेव्हा भाजपचे स्थानिक नेते ‘हा प्रकल्प कोळशासाठी नाही’ असे खोटे बोलत आहेत, असे ॲड. फेरेरा पत्रकात म्हणतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.