
पणजी: भारतातील भ्रष्टाचार, राजकीय अनास्था आणि सरकारची उदासीनता यावर गोव्याच्या अभियंत्याने संताप व्यक्त केला आहे. '40 टक्के कर भरुन प्रदूषित हवेत श्वास घेऊ शकत नाही, 2025 ला भारत कायमचा सोडतोय', असे म्हणत अभियंत्याने तुमच्याकडे देखील अधिक पैसे असतील तर भारत सोडा, असा सल्ला दिला आहे. अभियंत्याची ही पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून, विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
सिद्धार्थ सिंग गौतम या सिव्हिल अभियंत्याने एक्स या समाज माध्यमावर भारतातील राजकारण आणि राजकीय अनास्थेवर टीका केली आहे. सिद्धार्थच्या प्रोफाईलनुसार तो गुंतवणूकदार, सिव्हिल अभियंता व माजी राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटर आहे.
"2025 मध्ये मी भारत सोडून कायमस्वरूपी सिंगापूरला शिफ्ट होईन. कागदपत्रांचे काम सुरु आहे. मी इथल्या राजकारण्यांना आणखी सहन करू शकत नाही. 40% कर भरुन प्रदूषित हवेत श्वास घेऊ शकत नाही ज्याची कोणीही जबाबदारी घेत नाही. माझी मनापासून एक सूचना आहे की जर तुमच्याकडे चांगले पैसे असतील तर कृपया तुम्हीही देश सोडा", अशी पोस्ट सिद्धार्थने केलीय.
सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये काही सकारात्मक मतं व्यक्त केलीयेत, तर काहीजणांनी त्याच्या या निर्णयावर टीका केलीय. 'तुमचे कुंटुंबीय त्रासात असतील आणि खूप समस्या असतील तर तुम्ही त्यांना सोडून द्याल का?', असा सवाल एका एक्स युझरने सिद्धार्थच्या पोस्टवर उपस्थित केला. त्यावर सिद्धार्थने, 'मी चार वर्षापूर्वी गोव्यात शिफ्ट झालो पण गोव्यातील AQI देखील वाढत आहे, त्यामुळे हाच आता शेवटचा पर्याय आहे', असे सिद्धार्थने उत्तर दिले.
देश सोडून जाण्यापेक्षा तुम्ही देशाच्या भल्यासाठी नागरिकांना जागृत करण्याचे काम का नाही करत?, असा सवाल अवंतिका कन्सल या पत्रकार महिलेने उपस्थित केला. यावर उत्तर देताना सिद्धार्थ पुन्हा हवेच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केला. राजकारण्याचे खिसे भरण्यासाठी पैसे दिल्यानंतर सामान्य नागरिकाने काय कारवे? असे सिद्धार्थ उत्तरात म्हणतो.
'काय गंमत आहे! बहुतेक IAS सुशिक्षित आहेत आणि त्यांच्यात सर्वकाही बदलण्याची क्षमता आहे परंतु ते देखील पैसे आणि सत्तेसाठी उच्च सरकारी पदे घेऊन शांत बसतात. देशातील सर्वात सुशिक्षित आणि कर्तबगार लोक देशाला नरकात घालत असताना सामान्य माणूस काय करणार?,' असा सवाल एका युझरने केला.
'प्रत्येकजण कर आणि भ्रष्टाचारातून पैसे कमवत आहे. मला आशा आहे तुम्हाला समजत असेल, मी का सांगायचा प्रयत्न करतोय', असे सिद्धार्थने उत्तर दिले.
अभियंता सिद्धार्थ याची पोस्ट आत्तापर्यंत वीस लाख लोकांपर्यंत पोहोचली असून, तीन हजार लोकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय तर तीन हजार लोकांनी रिपोस्ट केलीय. तसेच, तीस हजार लोकांनी त्याची X पोस्ट लाईक केलीय. सिद्धार्थच्या पोस्टवर अनेकांनी भारतातील भ्रष्ट राजकारण आणि राजकारण्यांवर सडकून टीका केलीय. तर, अनेकांनी देशातून निघून जाण्याचा सल्ला दिलाय. दरम्यान, सिद्धार्थची पोस्ट सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.