
आगोंद: काणकोणात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चावडी येथील रवींद्र भवनाबाहेर पाणी तुंबले व जवळच्या घरात शिरले. त्यामुळे कुटुंबीयांची गैरसोय झाली.
दरम्यान, सभापती रमेश तवडकर यांनी स्थानिक नगरसेवक रमाकांत नाईक गावकर, उपजिल्हाधिकारी प्रतापराव नाईक गावकर, मामलेदार गजेश शिरोडकर या ठिकाणी भेद देऊन पाहणी केली.
तवडकर यांनी पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. रवींद्र भवन प्रवेशद्वारापासून तातडीने नवे गटार बांधण्यास सांगण्यात आले आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दिलीप केंक्रे, विशाल देसाई, बबेश बोरकर, संजय कोमरपंत, शंकर नाईक, आनंदराव देसाई आदी उपस्थित होते.
एकतानगर, हाऊसिंगबोर्ड, म्हापसा येथे जलवाहिनी घालण्यासाठी रस्त्याच्या बाजूने केलेले खोदकाम अर्धवट ठेवल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. तसेच गटारांचीही दुरुस्ती न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने काणाडोळा केल्याने वाहनचालक व स्थानिक संताप व्यक्त करीत आहेत.
खोदकाम केलेल्या रस्त्याची सध्या वाताहत झाली आहे. त्यात गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांना बराच मनस्ताप सहन करावा लागतो.
या रस्त्यांची तसेच गटारांची दुरुस्ती पावसापूर्वी करण्याची मागणी येथील रहिवाशांनी आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्याकडे केली होती. परंतु जलवाहिनीचे काम पूर्ण न झाल्याने कामाला थोडा विलंब होईल, असे सांगितले होते. मात्र सध्या या रस्त्यावर वाहने हाकणे कठीण होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.