

मडगाव: स्थानिक लोकांना विश्वासात न घेता सरकारने तिसरा जिल्हा लोकांवर लादू नये. काणकोणची जनता कुठल्याही परिस्थितीत तिसऱ्या जिल्ह्यात सहभागी होणार नाही, असे मत गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक यांनी मांडले. सरकारने बुधवारी केपे येथे ‘कुशावती’ या तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा केली.
त्यात काणकोण तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. काणकोणच्या जनतेला सरकारने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप प्रशांत नाईक यांनी केला आहे.
फोंड्याचे आमदार स्व. रवी नाईक यांनी तिसऱ्या जिल्ह्याची मागणी लावून धरली होती. त्यांना तिसरा जिल्हा फोंड्यात हवा होता. मात्र, भाजप सरकार रवी नाईक यांचा वारसा संपवू पाहत आहे. त्यांनी स्व. मनोहर पर्रीकर यांच्या संदर्भातही असेच केले आहे, असे प्रशांत नाईक यांनी म्हटले आहे.
काल सरकारने तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा केली. त्यात काणकोण तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, काणकोणच्या जनतेचा विरोध असून लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलावून तिसऱ्या जिल्ह्यासंदर्भात सर्वांची मते जाणून घेतली जातील, असे प्रशांत नाईक यांनी सांगितले.
नवीन कुशावती जिल्ह्यामुळे काणकोण, केपे, सांगे व धारबांदोडा या चारही तालुक्यांचा प्रशासकीय सुधारणेबरोबरच आर्थिक, सामाजिक विकास होणार असल्याचा विश्वास माजी उपमुख्यमंत्री व कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी व्यक्त केला आहे.
कुशावती जिल्ह्याची निर्मिती करून जिल्ह्यास समर्पक नाव दिल्याबद्दल तसेच जिल्हा मुख्यालय केपे केल्याबद्दल कवळेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहेत. केपे शहराला जिल्हा मुख्यालयाचा दर्जा देण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली होती. तसेच विविध व्यासपीठांवरही हा विषय सातत्याने मांडला होता, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.