

आगोंद: काणकोण येथील राष्ट्रीय महामार्गावरील चार-रस्ता ते माशे पर्रीकर बायपास या मार्गावर ६० हून अधिक अपघात घडले असून, त्यामध्ये काही जीवघेण्या अपघातांचाही समावेश आहे. ही बाब अत्यंत चिंतेची असल्याचे काणकोण तालुक्यातील श्रीस्थळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवराज देशमुख यांनी सांगितले.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी चढ-उतार आहेत. या चढ-उतारांमुळे वेगाने धावणारी वाहने उसळतात आणि परिणामी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी केरी येथील सरळ रस्त्यावर काणकोणहून आगोंदकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाची रस्त्याकडेला असलेल्या पथदीपाच्या वीज खांबाला धडक बसून मोठा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. अपघात इतका जबरदस्त होता की वीजखांब उन्मळून पडला. हा खांब काल वीज कर्मचाऱ्यांनी बदलून वीजप्रवाह सुरळीत केला.
पणसुले येथील निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक देसाई यांच्या मते, अतिवेग, बेदरकार वाहनचालक आणि रस्ते-पायाभूत सुविधांतील त्रुटी ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत.
योग्य सूचना फलकांची गरज
हे अपघात रोखण्यासाठी रस्त्यांवर योग्य सूचना फलक लावणे, रस्ते अभियांत्रिकीमध्ये सुधारणा करणे आणि वाहतूक नियंत्रणावरील देखरेख वाढवणे आवश्यक आहे. पर्यटक ‘रेंट अ बाईक’ व कार घेऊन बेफाम वाहन चालवतात, यावरही नियंत्रण ठेवावे, अशा मागण्या स्थानिक रहिवाशांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.