

काणकोण: यंदा पावसाने ऐन पेरणीच्या काळात हुलकावणी दिल्याने काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे २,५२० हेक्टर भरड लागवड क्षेत्रापैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणी होऊ शकली नाही. मात्र, अधूनमधून पडणारा पाऊस पाणथळ खरीप भातशेतीसाठी पोषक ठरत असल्याने भरड शेतीची तूट पाणथळ भातशेती भरून काढेल, असा आशावाद शेतकरी व कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
काणकोणात खरीप भातशेतीखाली १४० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी यंदा ४५ हेक्टर क्षेत्र वायंगण शेतीखाली असून, त्यात आणखी ४ हेक्टर क्षेत्राची भर पडली आहे. गेल्या चार वर्षांत अनेक वर्षे पडिक असलेली सहा हेक्टर जमीन पुन्हा भातशेतीखाली आणण्यात आली आहे.
भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रातही वाढ झाली आहे. खरीप हंगामात २० हेक्टरवर विविध भाजीपिकांची लागवड करण्यात आली असून, रब्बी हंगामात ३५ हेक्टर क्षेत्रावर भाजीपिके घेतली जाणार आहेत. काणकोणात नवीन व जुन्या काजू लागवडीखाली ६८ हेक्टर जमीन असल्याचे विभागीय कृषी अधिकारी सर्वानंद सर्वणकर यांनी सांगितले.
मिरची वाळविणे सुलभ
मिरची शेतीवरही पावसाचा परिणाम झाला. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना कृत्रिमरीत्या पाणी द्यावे लागले. मात्र, यंदा अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे मिरची वाळवण्याचे काम सुलभ झाले असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.