
पणजी: मंत्रिमंडळ फेरबदलात आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे वाटणारे आता विधानसभेचे अधिवेशन केव्हा होते, याची प्रतीक्षा करू लागले आहेत. त्यांना अद्यापही विधानसभा अधिवेशनानंतर मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होईल, असे वाटत आहे.
त्यापैकी काहींनी खासगीत पत्रकारांना खरेच मुख्यमंत्री फेरबदल करणार का, अशी विचारणा करणे सुरू केले आहे. दिल्ली दौऱ्यावरून आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी या विषयावर बोलायचेच नाही, असे ठरविल्याने दिल्लीत काय घडले असावे, याचा निव्वळ अंदाज लावला जात आहे.
मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला तरी राज्यभरातील भाजप नेत्यांची हे आपले सरकार, अशी भावना आहे. त्याचमुळे चांगल्यासाठी मंत्रिमंडळात बदल व्हावा, असे त्यांना वाटत आहे. त्यांच्या खासगीतील चर्चेत सध्या मंत्रिमंडळ फेरबदल केव्हा, असा विषय असतो.
भाजपमधील अनेक नेत्यांचेही या घडामोडींकडे लक्ष आहे. २०२७ च्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल व्हावा, असे त्यापैकी काहींना वाटते. मंत्रिमंडळ फेरबदल लांबणीवर पडत चालल्याचे दिसल्यानंतर त्यांच्यातही अस्वस्थता दिसून येत आहे.
दामू नाईक यांनी प्रसिद्धी माध्यमांतूनच आपण मंत्रिमंडळ फेरबदलाच्या बातम्या वाचतो, असे सांगून या विषयातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री तर थेटपणे मंत्रिमंडळ कधी होणार, होणार की नाही, अशा थेट प्रश्नांवरही बोलत नाहीत. ते केवळ स्मित करून हा विषय टोलवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.