
Sadanand Tanavade About Suleman Khan Escape Case
पणजी: पोलिस कोठडीतून सुलेमान महमद खान ऊर्फ सिद्दीकी पळून जाणे ही पोलिसांची चूकच आहे, असे जाहीरपणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सिद्दीकी पळून जाण्यास कोण जबाबदार हे सरकार १० दिवसानंतरही सांगू शकलेले नाही. सिद्दीकीचा शोध लावणे सोडाच, त्या दिवशी गुन्हे शाखेच्या पोलिस ठाण्यात काय झाले याचा शोधही पोलिस लावू शकलेले नाहीत.
या साऱ्या पार्श्वभूमीवर तानावडे यांचे वक्तव्य उठून दिसणारे आहे. पत्रकार परिषदेत याविषयी विचारले असता ते म्हणाले, चूक ही चूकच. पोलिस कोठडीची चावी एका शिपायाकडे कशी दिली यापासून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. याविषयी प्रश्न जरूर निर्माण झाले आहेत. असे असले तरी एखाददुसऱ्या घटनेवरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.
पोलिसांचे अपयश हे सरकारचे अपयश ठरवू नये. अनेक खात्यांपैकी पोलिस हे एक खाते आहे. सुलेमानला यापूर्वी पोलिसांनीच पकडले होते. आताही त्याला तेच पकडून आणतील. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. त्यांच्या येथील नेत्याने तेथील गृहमंत्र्याला पत्र लिहिले आहे. ‘सुलेमानला गोव्याच्या स्वाधीन करा’ असे त्याचे म्हणणे आहे, जणू सुलेमानला कर्नाटकात त्यांनीच दडवून ठेवले असावे? असेही तानावडे म्हणाले.
भाजपचे प्रदेश सचिव दयानंद सोपटे यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तानावडे म्हणाले, आदिवासी समाजाची न्याय्य मागणी भाजपच्या केंद्रातील सरकारने लोकसभा निवडणुकीआधीच मान्य केली आहे. त्यासाठीचे कायदेशीर सोपस्कार सध्या पार पाडण्यात येत होते. राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचे पुनर्स्थापन करण्यासंबंधीचे ‘गोवा विधेयक - २०२४’ लोकसभेत चर्चेसाठी मांडण्यात आले होते. केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या विधेयकाचा विचार आणि मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवला होता. पहिल्याच दिवशी १३ खासदारांनी त्यावर आपली मते व्यक्त केली. नंतरच्या दोन दिवसांत नसलेल्या कारणांवरून काँग्रेसचे खासदार आक्रमक झाले आणि त्यांनी लोकसभेत कामकाज होऊ दिले नाही.
राज्यातील गावडा, कुणबी, वेळीप या आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठीचे विधेयक लोकसभेत संमत न होण्याचे खापर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काँग्रेसवर फोडले. तानावडे हे राज्यसभेचे सदस्य असून अधिवेशन काळात दिल्लीत होते.
हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असते, तर राज्यसभेतही ते याच अधिवेशनादरम्यान मंजूर झाले असते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर आदिवासी समाजाला आरक्षण देणारा कायदा अस्तित्वात आला असता. हे सारे न घडण्यासाठी काँग्रेसचे अकारण आक्रमक रूपच कारणीभूत आहे.
घटना वाचवण्यासाठी काँग्रेस आपण वावरत असल्याचा बनाव करते. प्रत्यक्षात १०६ घटना दुरुस्तींपैकी ७७ दुरुस्त्या या काँग्रेसने केल्या आहेत. त्यांनी केलेल्या दुरुस्त्या या खुर्ची वाचवण्यासाठी आणि राजकीय फायदा घेण्यासाठीच केल्या आहेत.
भाजपने केलेल्या १२ दुरुस्त्यांत वस्तू व सेवा कर प्रणाली लागू करणे, आर्थिक कमकुवत गटाला आरक्षण देणे, महिलांना एक तृतीयांश आरक्षण देणे, मागास समाजाचे निर्णय राज्याच्या पातळीवर घेण्याचे अधिकार राज्यांना देणे अशा सामाजिक कामांसाठी केल्या आहेत.
संसदेतील चर्चेतून काँग्रेस उघडी पडली आहे. चर्चा करण्याचा आग्रह काँग्रेसनेच धरला आणि काँग्रेसच उघडी पडली. काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.