

सासष्टी: भारतीय जनता पक्ष तळागाळातून उभा राहिलेला पक्ष असून, सतत जनतेमध्ये राहून काम केल्यामुळेच पक्षाने राज्यात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे तिसरी आघाडी किंवा अन्य कोणत्याही आघाड्या स्थापन झाल्या तरी भाजपला त्याची भीती नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
भाजप एका रात्रीत उगवलेल्या अळंबीसारखा पक्ष नाही, असा टोला लगावत नाईक म्हणाले की, शेवटी जनता पक्षाचे काम पाहते. लोकहिताच्या प्रश्नांवर भाजपने कुठेही कसूर केलेली नाही. त्यामुळे २०२७ मध्ये जनता पुन्हा भाजपला संधी देईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, फातोर्ड्यातील स्वतःच्या उमेदवारीबाबत बोलताना नाईक यांनी फातोर्ड्यात भाजपला विजयी करणे हे आपले लक्ष्य असल्याचे सांगितले. केवळ सौंदर्यवर्धक विकास नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी भाजपची पायाभूत रचना मजबूत असल्याने कितीही आघाड्या झाल्या तरी पक्षावर परिणाम होणार नसल्याचे सांगितले. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी भाजपने गोव्याचा विकास केला असून, पक्षाने तळागाळातील जनतेच्या मनात स्थान मिळविले आहे. २०२७ मध्ये जनता भाजपच्या कामाची पावती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोयकारपण जपणारा पक्ष
गोव्यात अनेक पक्ष आले आणि गेले. मात्र, त्यांना आपले अस्तित्व टिकवता आले नाही. काही राजकारण्यांना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी तिसऱ्या आघाडीची गरज भासत आहे, अशी टीकाही दामू नाईक यांनी केली. भाजप गोयकारपणाचा विचार करणारा पक्ष असून, मगो पक्षासोबतची युती कायम राहील. यासंदर्भातील आवश्यक चर्चा योग्यवेळी होईल, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.