

डिचोली: तालुक्यातील मयेसह विविध ग्रामीण भागात सध्या मिरची तसेच भाजी लागवडीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत लागवडीची कामे पूर्ण होणार आहेत, असा अंदाज आहे.
यंदा उशिरापर्यंत पडलेल्या पावसामुळे ही कामे काहीसी लांबणीवर पडली होती. पावसामुळे जमीन ओलसर होती, त्यामुळे कामे खोळंबून पडली होती.
यंदाही तालुक्यात दीडशेपेक्षा अधिक हेक्टर जमीन भाजी लागवडीखाली येणार आहे, अशी माहितीही विभागीय कृषी कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. मिरची, भाजी लागवडीची कामे लांबणीवर पडली असली तरी मिरची, भाजी पिकासाठी सध्या तरी हवामान पोषक असल्याचा दावा कृषी खात्याकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, मिरची रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव टळावा, यासाठी कृषी खात्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गेल्या वर्षी मिरची पीक बहर आला असतानाच मये भागात चुरडा-मुरडा रोगाची लागण झाली होती.
मिरची लागवडीसाठी जमिनींची मशागत सध्या चालू आहे. अवकाळी पावसामुळे यंदा कामांना काहीसा उशीर झाला. पुढील आठवड्यानंतर मिरचीची लागवड करण्याचे काम हाती घेण्यात येईल.
- वासू नाईक हरमलकर, शेतकरी, मये
मशागतीच्या कामांना जोर
रब्बी हंगामात डिचोलीतील साळसह, मेणकूरे, पिळगाव, मये, कारापूर, बोर्डे आदी ग्रामीण भागातील शेतकरी मिरचीसह गावठी भाज्यांची लागवड करतात. साळ, मेणकूरे, पिळगाव, मये आदी काही भाग मिरची आणि भाजी लागवडीत अग्रेसर आहेत.
विविध भागात शेतकऱ्यांनी लागवडीसाठी जमिनी तयार केल्या आहेत. मये, पिळगाव आदी भागात मुळा, वाल, वांगी, तांबडी आदी भाज्यांसह मिरचीची रोपे रुजून आली आहेत. सध्या जमिनीची मशागत जोरात सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.